शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या स्वधर्माची राखण तुम्ही करणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 06:31 IST

समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही : भारताचा मूलाधार असलेल्या या तीन मूल्यांवर आज एकाचवेळी हल्ले होत आहेत; आपण सगळे काय करणार?

योगेंद्र यादव,संयुक्त किसान मोर्चाचे नेते

आजच्या परिस्थितीचे मूल्यमापन करायचे तर त्यासाठी एखादे पुस्तक, विचारधारा किंवा एखाद्या व्यक्तीचे विचार हे निकष होऊ शकणार नाहीत. भारताचा स्वधर्म हाच आज देशाची परिस्थिती समजून घेण्याचा निकष होऊ शकतो. करुणा, मैत्री आणि शील यांचा त्रिवेणी संगम भारताच्या स्वधर्माला परिभाषित करतो, हेही आपण पाहिले.

समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या तीन गोष्टी आपल्या संस्कृतीच्या आदर्शांचे आधुनिक रूप आहे. तर मग आज या तीन मूल्यांवर हल्ला होत आहे का? तो हल्ला किती भयंकर आहे? गेल्या ७५ वर्षांत भारताच्या स्वधर्माच्या बाबतीत कधीही न्याय झाला नाही, हे वास्तव आहे. सत्तेवर कुठलाही पक्ष असो, त्याने धर्माच्या नावाने अधर्माचाच प्रसार केला आहे. 

फाळणीच्या संकटातून निर्माण झालेल्या या देशासाठी सांप्रदायिक सदभाव, विशेषतः हिंदू मुस्लिम एकता सांभाळणे हे सगळ्यात मोठे आव्हान राहिले आहे. गेल्या ७५ वर्षांत या आदर्शावर वारंवार आघात झाले. हिंदू-मुस्लिम ऐक्याला आव्हान देणाऱ्या सर्व घटना आणि दंगलींच्या व्यतिरिक्त पोलीस, प्रशासन आणि नेते एका बाजूची भूमिका घेऊन उभे राहिले, असे अनेकदा घडले. मग तो १९८४ मध्ये झालेला शिखांचा नरसंहार असो, नेली, मलियाना तसेच गुजरातमधील कत्तली असोत किंवा काश्मिरी पंडितांचे नाईलाजाने झालेले पलायन. या सर्व भारताच्या स्वधर्मावर झालेल्या हल्ल्याच्या घटना आहेत; परंतु गेल्या काही वर्षांत हे हल्ले अधिक घातक होत गेले. 

पहिल्यांदा नागरिकता कायद्यात दुरुस्ती करून धर्माच्या आधारावर नागरिकांचा दर्जा ठरवून वाटणी झाली. सार्वजनिक व्यासपीठावरून धर्माच्या नावाने नरसंहाराचे आवाहन केले जाऊ लागले. रस्त्यांवर माणसे ओळखून, ठेचून मारली गेली. धार्मिक भेदभाव इतके दिवस अपवादाने होत असे; तो आता सामान्य नियम केला गेला आहे. सत्तेच्या शीर्षस्थानावरून खुलेआम अल्पसंख्याक समुदायाच्या विरुद्ध जनमत भडकवले जात आहे. ७५ वर्षांनंतरसुद्धा गरिबी भूकबळी आणि कुपोषण असणे हा समतेच्या आदर्शावर कलंक आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या आकडेवारीवरून असे दिसते की काही दशके कुपोषण आणि भूकबळी कमी झाले होते; परंतु पुन्हा एकदा देशात त्याचे प्रमाण वाढले आहे. बेरोजगारीचा भडका एकीकडे परंतु गेल्या अडीच वर्षांत गौतम अदानी यांची संपत्ती मात्र ६६ हजार कोटी रुपयांनी वाढून १२ लाख कोटी रुपये झाली.  समतेच्या घटनात्मक आदर्शांची अशी पायमल्ली या देशाने कधी पाहिली नव्हती.

शील या आदर्शातून सत्तेच्या मर्यादा आणि लोकशाहीचा विचार जन्माला आला. जवाहरलाल नेहरू यांच्या काळात लोकशाहीतील मर्यादा निश्चितीचे पालन झाले; परंतु इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर लोकशाही मूल्यांचा ऱ्हास झाला. आणीबाणीत भारताच्या लोकशाहीवर सर्वात मोठा डाग लागला. त्यानंतरही नागरिकांचे स्वातंत्र्य आणि घटनात्मक मर्यादांचे उल्लंघन होत राहिले. सत्तेचा हात लोकांवर कायम उगारलेलाच राहिला. विशेषतः मागच्या तीन वर्षांत तर सर्व मर्यादा धुडकावल्या गेल्या. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयासारख्या संस्थांचा दुरुपयोग यापूर्वीही झाला होता; परंतु सरळ सरळ राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्याच्या बाबतीत आता कोणताच विधिनिषेध बाळगला जात नाही. निवडणूक आयोगाच्या बाबतीत तर आता एवढाच प्रश्न उरला आहे की ते सत्तेवरच्या सरकारचे कार्यालय आहे की पक्षाचे? न्यायव्यवस्थेनेही स्वतःहून आपल्या मर्यादा आखून घेतल्या आहेत. मुख्य प्रवाहातील माध्यमे कमी-जास्त प्रमाणात सत्तारूढ पक्षाच्या खिशातच आहेत. जो बोलण्याची हिंमत दाखवतो त्याला तुरुंगाचा रस्ता दाखवला जातो.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात स्वधर्मावरचा हा पहिला हल्ला नाही, हे उघडच होय; परंतु आज होत असलेला हल्ला चार प्रकारांनी अभूतपूर्व आणि अत्यंत घातक आहे.  पूर्वी एकावेळी तीनपैकी एखाद्या आदर्शावर हल्ला होत असे, आता तिन्हीच्या तिन्ही आदर्शांवर एकाच वेळी हल्ला होत आहे. शिवाय हे हल्ले घटनात्मकरीत्या सत्तेवर आलेल्या शक्तींनी प्रायोजित केलेले आहेत. खूप मोठी संघटनात्मक ताकद आणि बेसुमार पैसा यांनी या हल्ल्याला बळ पुरवले आहे. आज भारतीय संस्कृतीचा गौरवशाली वारसा, भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास आणि भारतीय घटनेच्या आदर्शांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा एकच धर्म असू शकतो : तन, मन, धन आणि गरज असेल तर आपल्या प्राणापेक्षा प्रिय अशा भारताच्या स्वधर्माची राखण त्याने करावी.

 

टॅग्स :Indiaभारत