सर्वस्पर्शी
By Admin | Updated: December 23, 2015 23:24 IST2015-12-23T23:24:03+5:302015-12-23T23:24:03+5:30
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भारतीय घटनेतील तीन मूलभूत तत्त्वे. यातील बंधुता हे तत्त्व भारतीय समाजात किती खोलपर्यंत रुजले आहे
_ns.jpg)
सर्वस्पर्शी
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भारतीय घटनेतील तीन मूलभूत तत्त्वे. यातील बंधुता हे तत्त्व भारतीय समाजात किती खोलपर्यंत रुजले आहे, याची प्रचिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यांमधून येत आहे. राजकारणात अजातशत्रू राहणे तसे फार कठीण; पण आपल्या उण्यापुऱ्या साडेपाच दशकांच्या राजकारणात शरद पवार यांनी काही मुलभूत तत्त्वांची जपणूक केली. तात्त्विक, वैचारिक मतभेद असले, तरी वैयक्तिक संबंधांवर परिणाम होऊ द्यायचा नाही, या मूल्याची पेरणी या जाणत्या राजाने आयुष्यभर केली. एकमेकांबद्दल कटुता न बाळगता परस्परांप्रति आदर व सन्मान बाळगणारी व सद्भाव जपणारी राजकीय संस्कृती त्यांनी विकसित केली. दिल्लीत झालेल्या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी देशातील सर्वोच्च नेत्यांची उपस्थिती पुरेशी बोलकी आहे. या सगळ्यांमधील विचारधारा वेगवेगळ्या असल्या, तरी शरद पवार यांच्याशी मैत्रीचा अनुबंध एक होता. जाणता राजा, लोकनेता, महानायक आदी अनेक उपाध्यांनी शरद पवार यांना गौरविण्यात येते; मात्र, ही सगळी विशेषणे थिटी पडावीत, असे त्यांचे अमीट कर्तृत्व आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाच्या ५५ वर्षांच्या प्रवासातील प्रत्येक पान शरद पवार यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहील. यशवंतराव चव्हाण यांचा सुसंस्कृत वारसा सांगत नव्या पिढीला विकासाभिमुख राजकारणाचा वसा देणाऱ्या या नेत्याने राजकारणातील सभ्यता व शालीनता कायम जपली. राज्य आणि केंद्रात अनेक पदे भूषविताना त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. विवेकवादाची कास धरत पुरोगामित्वाची महाराष्ट्राची परंपरा जपली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून सत्ता जाण्याचीही तमा बाळगली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देऊन देशापुढे आदर्श ठेवला. महाराष्ट्राच्या हिताचा आणि देशाच्या भवितव्याचा विचार करून धडाडीने अनेक निर्णय घेतले. त्यांच्यावर अनेकदा जहरी टीका झाल्या, प्रहार झाले. वेदनादायी आरोपांची राळ उठली. मात्र, विचलित न होता त्यांनी आपली वाटचाल अविरत चालू ठेवली. विरोधकांवरही त्यांनी कधी सभ्यतेच्या मर्यादा सोडून टीका केली नाही. सत्तेत असो किंवा नसो, ते सदैव कार्यरत राहिले. त्यांचे कर्तृत्व प्रांतांच्या सीमा ओलांडून गेले. त्यामुळेच विरोधी पक्षात असतानाही राजीव गांधी असोत की चंद्रशेखर किंवा अगदी अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्यावर वेळोवेळी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या. राजीव गांधी-संत लोंगोवाल कराराचे शिल्पकार शरद पवार होते. रामजन्मभूमीच्या प्रश्नावर दोन्ही बाजूंना एकत्र आणण्याची किमया शरद पवार यांनीच केली होती. किल्लारीत त्यांनी केलेल्या अद्वितीय कामाची आठवण ठेवून भुज भूकंपानंतर वाजपेयींनी आपत्ती व्यवस्थापन समितीचे नेतृत्व त्यांच्याकडे विश्वासाने सोपविले. शेतकरी, कष्टकरी, कामगार हितैषी भूमिका ठेवतानाच नव्यायुगाची, आधुनिक तंत्रज्ञानाची हाक ओळखून उद्योजकतेला प्रोत्साहन दिले. साखर कारखानदारी, पोल्ट्री, सूतगिरण्या आदी क्षेत्रात देशात आणि विदेशातही कोणते वेगवेगळे प्रयोग झाले आहेत, याचा सातत्याने अभ्यास केला. त्यांचे काही निर्णय चुकलेही असतील, त्यांच्या भूमिकांबद्दल संशयही निर्माण झाला असेल; पण म्हणून त्यांचे असीम कर्तृत्व व योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. आज पंचाहत्तराव्या वर्षीही त्याच ऊर्जेने, त्याच उमेदीने, त्याच उर्मीने काम करणाऱ्या शरद पवारांच्या कार्यक्षमतेचे अनेक किस्से सांगितले जातात. संपूर्ण महाराष्ट्र उभा-आडवा माहीत असणारा दुसरा नेता नाही, असे उगीच म्हटले जात नाही एवढा त्यांचा अफाट लोकसंग्रह आणि आवाका आहे. शरद पवार यांचा सत्कार म्हणजे प्रगतिशील महाराष्ट्राच्या प्रवासातील एक सोनेरी पान आहे. लोकमत माध्यम समूहातर्फे आज त्यांचा सत्कार होत आहे. राज्य आणि देशात झालेले व होत असलेले शरद पवार यांचे सत्कार त्यांनी आजवर जोडलेल्या माणसांचा, मैत्रीच्या जपणुकीचा प्रत्यय देत आहेत. विचारधारांचा संघर्ष वैयक्तिक पातळीवर आल्याने निर्माण झालेल्या राजकीय अहिष्णुततेच्या वातावरणात शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कारांमुळे निकोप राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. देशवासियांना शरद पवार यांनी जणु ही भेट दिली आहे.
- विजय बाविस्कर