‘आप’ताप व भाजपा

By Admin | Updated: February 2, 2015 06:30 IST2015-02-02T00:46:35+5:302015-02-02T06:30:11+5:30

भाजपाचे हे नेहमीचेच झाले आहे. करून सवरून पुन्हा नामानिराळे होण्याचा प्रयत्न करायचा. बाबरी पतनाच्या वेळी असाच अनुभव आला होता

'Aap' and BJP | ‘आप’ताप व भाजपा

‘आप’ताप व भाजपा

भाजपाचे हे नेहमीचेच झाले आहे. करून सवरून पुन्हा नामानिराळे होण्याचा प्रयत्न करायचा. बाबरी पतनाच्या वेळी असाच अनुभव आला होता. हे पतन करण्यात विहिंप, संघ आणि तत्सम संघटनांचा सक्रिय सहभाग असतानाही, भाजपाने आपली जबाबदारी झटकून टाकली होती. त्याउलट आपले सैनिक अयोध्येपर्यंत गेले अथवा नाही याची खातरजमा न करताच, ‘ती मुलं शिवसेनेची असतील तर मला त्यांचा अभिमान आहे’, असे रोखठोक विधान करून सेनाप्रमुख मोकळे झाले होते. तसाच काहीसा प्रकार दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने घडला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ची कोंडी करण्यासाठी काही व्यंगचित्रे राजधानीत झळकली. त्यात अण्णा हजारे यांची प्रतिमा आणि तिच्या गळ्यात हार, असे काही चितारले गेले. आपने लगेच या चित्राची दखल घेतली. जिवंत माणसाच्या प्रतिमेला हार घालीत नाहीत, तो केवळ मृत व्यक्तीच्या फोटोलाच घातला जातो, असा युक्तिवाद करून आपने भाजपाला खिंडीत गाठले. पण आपचा हा ताप सहन न झालेल्या भाजपाने लगेचच, छे; छे, हे काम आमचे नाहीच, असा विश्वामित्री पवित्रा धारण केला. खरे तर तो तसा धारण करण्याचे कारण काय, तर करून सवरून मोकळे होण्याची वृत्ती. वास्तविक पाहता, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ज्या दोघांना भावी मुख्यमंत्री म्हणून मतदारांसमोर पेश केले गेले आहे, त्यातील आपचे केजरीवाल आणि भाजपाच्या किरण बेदी, असे दोघेही कोणे एकेकाळचे अण्णांचेच कल्याण शिष्य. दोघांनीही अर्ध्या वाटेतच अण्णांचा हात सोडून दिला आणि त्यांच्या अशा हात सोडून जाण्यावर अण्णांनी आगपाखड करूनही त्यांनी चक्क दुर्लक्ष केले. याचा अर्थ दोहोंनी एका अर्थाने अण्णांचे निर्माल्यच करून टाकले. निर्माल्य करून ते गंगेत सोडून देण्यापेक्षा त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करणे तुलनेने सौम्य अपराधच म्हणायचा. त्यातून भाजपावाले लोक युक्तिवादाला तसे न घाबरणारे. तेव्हा अण्णा आम्हाला आजही प्रात:स्मरणीय आहेत व अशा मंडळींच्या तसबिरीला पुष्पमाला अर्पण करणे आमच्या लेखी पुण्यकर्म आहे, असे त्यांना म्हणता आले असते व त्याच्या पुष्ट्यर्थ काही बापू, बाबा, अम्मा यांचे दाखलेही देता आले असते. पण त्यांनी पळपुटेपणा केला आणि खुद्द अण्णा मात्र यावर मौनात गेले आहेत. त्यांच्या मौनाचीदेखील एक धमालच असते. अगदी अलीकडे एका खासगी चित्रवाहिनीला मुलाखत देताना अण्णा हजारे असे म्हणाले की, किरण बेदी वा अरविंद केजरीवाल यापैकी कोणीही मुख्यमंत्री झाला तरी अखेर माझा शिष्यच मुख्यमंत्री होणार आहे !
संपूर्ण राष्ट्राच्या वतीने आणि राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणारे पद्म पुरस्कार हा कोणे एकेकाळी मोठा गौरवाचा भाग मानला जात होता, असे म्हणतात. त्यात नंतर काही हिरमुसल्यांनी न्यायालयीन झगड्याला आमंत्रित केले आणि एके वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांचे वाटपच न्यायालयाने रोखून धरले. परिणामी एका ज्येष्ठ मराठी संपादकाला जाहीर झालेला ‘पद्मभूषण’ जो अडकून पडला, तो कायमचाच. दरम्यान, पुरस्कार ‘वाटपात’ घुसखोरी आणि वशिलेबाजी होत असल्याचे आरोप सुरू झाले. पुढे पुरस्कार तुला की मला, असा अत्यंत ‘खिलाडू वृत्तीचा’ सामना खेळला जाऊ लागला. अधूनमधून जाहीर झालेले पुरस्कार नाकारण्याचे प्रकार होऊ लागले. स्वीकारलेले पुरस्कार परत करण्याची भाषा सुरू झाली. सरकारच्या मनीध्यानी ज्यांची नावे नाहीत, त्यांनी केवळ चॅनेलीय बातम्यांच्या आधारे, आपल्याला पुरस्कार मिळणार असे गृहीत धरून, देऊ (न) केलेले पुरस्कार सविनय परत करण्याची भाषा सुरू केली. दोघांच्या भांडणात कुणालाच पुरस्कार नाही, हेही मग घडून येऊ लागले. शिष्याला अगोदर आणि मला नंतर काय, असा रोकडा सवाल उपस्थित करून गुरूकरवी पुरस्कार ठोकरून देण्याचे प्रकारही घडून आले. पण त्याचवेळी एका बच्चन कुटुंबात एक-दोन नव्हे, तर चक्क सात पद्म पुरस्कार गेल्याची गौरव गाथा गायिली जाऊ लागली. या कुटुंबातील आता केवळ आराध्या तेव्हढी पद्म-वंचित राहिली. न जाणो पुढच्या वर्षी ती कसरही भरून निघेल. त्याबद्दल आनंदच राहील. पण इतके पुरस्कार मिळूनदेखील आराध्याची आजी, जयाबाई बच्चन यांनी त्यांचे भ्रतार अमिताभ यांना ‘भारतरत्न’ दिले गेले नाही, म्हणून शिर्डीच्या साईबाबांना साक्षी ठेवून खंतवजा फणकारा व्यक्त करावा आणि ‘माझे ते भारतरत्नच आहेत’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करावी, यावरून पद्म पुरस्कारांचा प्रवास किती रमणीय आहे याची कल्पना करता येते. पद्म पुरस्कारांच्या बाबतीतही प्राथमिक शाळेसारखे काही नियम असावेत असे अलीकडेच निदर्शनास आले. म्हणजे प्ले ग्रुप, नर्सरी, केजी (वन अ‍ॅण्ड टू) आणि मग पहिली!आधी पद्मश्री व त्यानंतर बाकीचे. अमिताभ यांना आत्ताशी कुठे पद्मविभूषण जाहीर झाला. भारतरत्नची पाळी त्यानंतरची. तो मिळेलच की जातो कुठे? पण सचिन तेंडुलकरला भारतरत्न जाहीर झाल्यापासून भारतरत्नाची वयोमर्यादा अंमळ कमी केली असावी, या समजुतीतूनच बहुधा जयाबेन कासावीस झाल्या असाव्यात.

Web Title: 'Aap' and BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.