शत प्रतिशत बेबनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2015 23:46 IST2015-05-26T23:46:15+5:302015-05-26T23:46:15+5:30

दोन परस्पर विरोधी विधाने एकाच दमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे झालेल्या भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीच्या अखेरीस बोलताना केली आहेत.

100 percent unexpected | शत प्रतिशत बेबनाव

शत प्रतिशत बेबनाव

युती तुटल्यामुळे भाजपाला आपली ताकद कळली, पण मुंबई महापालिकेच्या निवडणुका युतीच लढेल, अशी दोन परस्पर विरोधी विधाने एकाच दमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे झालेल्या भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीच्या अखेरीस बोलताना केली आहेत. आम्ही युतीस तयार आहोत, पण अवास्तव अटी मान्य करणार नाही, पाहिजे तर बघा, अन्यथा आमची ताकद आम्ही दाखवून दिलीच आहे, असा सेनेला इशारा देण्यासाठी ही परस्पर विरोधी वक्तव्यं केली जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आधी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘शत प्रतिशत’चा नारा दिला. अर्र्थात ही ‘शत प्रतिशत’ची आकांक्षा तशी जुनीच आहे आणि त्याचे कारणही सेना व भाजपाच्या युतीत सुरूवातीपासूनच असलेले ताणतणाव हेच आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र आले, ते आपापले हितसंबंध जपून ते जोपासले जावेत, याचसाठी. महाराष्ट्रातील भाजपात ‘सोशल इंजिनियरिंग’चा प्रयोग वसंतराव भागवत यांनी १९७७ साली केला, तरीही या पक्षाची राज्यातील प्रतिमा ही मुख्यत: व्यापारी, उद्योजक, शहरी मध्यमवर्ग यांच्या हितसंबंधांची पाठराखण करणारा अशीच होती. उलट साठच्या दशकाच्या मध्यास स्थापन झालेल्या सेनेचा ‘मराठी बाण्या’चा प्रयोग ऐंशीच्या दशकाच्या सुरूवातीस अर्थव्यवहाराचे चक्र बदलू लागल्यावर कंटाळवाणा ठरू लागला होता. तोपर्यंत मुंबई-पुणे पट्ट्याबाहेर पसरत चाललेल्या सेनेचा आपल्या वाढीसाठी वापर करून घेण्याचा भाजपाचाही इरादा होता. सेना भाजपाला कायम ‘छोटा भाऊ’ म्हणून नव्हे, तर युतीतील ‘दुय्यम घटक’ म्हणून वागवत आली होती. सेनाप्रमुखानंतर उद्धव ठाकरे यांच्या हाती पक्षाची सूत्रे आली, भाजपाच्या भल्या भल्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याआधी त्यांच्या खाजगी सचिवाशी चर्चा करावी लागत होती. सेना देत असलेल्या अशा वागणुकीमुळे जी चीड होती, त्यातून काही वर्षांपूर्वी ‘शत प्रतिशत’ची मोहीम भाजपाने हाती घेतली होती. पण तेव्हा देशातील एकूण वातावरण आणि राज्यातील राजकीय परिस्थिती भाजपाने ‘शत-प्रतिशत’ बनण्यासाठी अजिबात अनुकूल नव्हती. आता ‘मोदी लाटे’वर स्वार झालेल्या भाजपाने सेनेला मागे टाकले आहे. ‘दिल्लीत तुम्ही मोठे भाऊ, तर राज्यात आम्ही’ ही सेनेची भूमिका भाजपाने रणनीतीचा भाग म्हणून जागा वाटपाच्या चर्चेचा घोळ घालून पद्धतशीरपणे झिडकारली. उलट आपण राज्यात दुय्यम बनलो आहोत आणि हे वास्तव बदलायचे असल्यास राजकीय धमक दाखवण्याची गरज आहे, हे सेनेला पटवून घेता आलेले नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे १५ वर्षे सत्तेपासून दूर राहिल्याने सेनेतील बहुसंख्य नेते घायकुतीला आले होते. अशा नेत्यांना भाजपा सत्तापदाचे गाजर दाखवत होती आणि त्याचबरोबर आम्ही सांगतो त्या अटीवर सत्तेत सहभागी व्हा, अन्यथा तुमचा पक्ष फोडू, अशी अप्रत्यक्ष धमकीही सेनेला देत होती. भाजपाची सगळी सूत्रे हाती असलेल्या मोदी-शहा या दुकलीला सेना नकोच आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठबळ फडणवीस यांच्यामागे उभे करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस हा नावापुरताच ‘राष्ट्रीय’ पक्ष आहे, प्रत्यक्षात तो प्रादेशिक पक्ष आहे. असा पक्ष राज्यात पुन्हा सत्तेच्या आधारे पाय रोवत असेल, तर आपल्याला मागे सारण्याची ही रणनीती आहे, हे सेना चांगलेच ओळखून आहे. उलट फडणवीस यांना ‘स्वच्छ प्रतिमे’चा सोस आहे. त्यामुळे पक्षातील दिल्लीश्वरांचे मन वळवून सेनेला युतीत सहभागी करून घेण्याचा डाव फडणीस विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी खेळले. पण सेनेला दुय्यम वागणूक देऊन खिजवतच राहिले. परिणामी सेना चडफडत राहिली आणि सत्तेत असूनही ‘विरोधी’ भूमिका घेत आहे. जैतापूरचा वाद हा सेना नेतृत्वाच्या या मन:स्थितीचाच परिपाक आहे. तेथेही सत्तेतील व पक्षातील सेना नेते यांच्यात कशी दुही आहे, हे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि सेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यात जैतापूरवरून जुंपलेली शाब्दिक चकमक दर्शवते. फडणवीस यांचे वक्तव्य हा इशारा आहे, हे सेना चांगलेच जाणते. मुंबई महापालिकेतील सत्ता हा सेनेचा ‘राजकीय प्राणवायू’ आहे. ही सत्ता गेली अथवा ती निसटण्याची वेळ आली, तर तगून राहणे सेनेला कठीण जाईल. भाजपाच्या आक्रमकतेमुळे सेनेचा जो खंदा पाठीराखा मतदार आहे, तो निवडणुकीपासूनच दुखावला गेला आहे. शिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनात गुजराती भाषिकांंबद्दल एक सुप्त अढी आहे. या दोन मुद्यांचा वापर करून सेना आपले पाठबळ वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणूनच सरकारी कार्यालये, व्यापार-उद्योग गुजरातेत जाण्याचा मुद्दा गेल्या सहा-सात महिन्यात वारंवार उफाळून येत राहिला आहे. भाजपा आपला हात सोडणार आणि धरून ठेवला, तरी तो पिरगळत राहणार, हे सेनेला ठाऊक आहे. स्वबळावर सेनेच्या हाती राज्याची सत्ता येऊ शकत नाही. फक्त प्रश्न आहे, तो सत्तेत समान वाटा मिळविण्याचा. तो कसा सेनेला मिळता कामा नये, यासाठी भाजपाचे सारे डावपेच आहेत. असा हा युतीतील ‘शत प्रतिशत’ बेबनाव आहे.

Web Title: 100 percent unexpected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.