लॉकडाउनच्या बेरोजगारीत यंत्रणा स्तरावर शुन्य कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 12:16 IST2020-05-14T12:16:27+5:302020-05-14T12:16:48+5:30
रोजगार हमी योजना : ग्रामपंचायत स्तराच्या ४०४ कामांवर १८९२ मजूर

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लॉकडाउनच्या बेरोजगारीच्या काळात शासनाच्या यंत्रणांनी रोजगार हमी योजनेचे एकही काम अजुनपर्यंत सुरु केले नसल्याने ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़
कोरोनामुळे लॉकडाउन केल्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झाले होते़ महानगरांमध्ये रोजगार बंद झाल्याने हजारो कामगार, कष्टकरी कुटूंब आपआपल्या गावाकडे परतले आहेत़ या सर्व मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता़
कोरोनामुळे विस्कटलेली राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काही उद्योग, व्यवसाय, रोजगार आणि शेतीची कामे सुरू करण्याची घोषणा गेल्या महिन्यात शासनाने केली होती़ जिल्हा प्रशासनाला तशा सूचना देण्यात आल्या होत्या़ पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील महानगरांमध्ये गेलेले हजारो स्थलांतरीत कामगार जिल्ह्यात आपआपल्या गावात परतले आहेत़ लॉकडाउनमुळे महानगरांमध्ये रोजगार बंद झाल्याने गावात मोलमजुरी करुन पोट भरता येईल या आशेने ते परतले़ परंतु लॉकडाउनचा फटका ग्रामीण भागातही बसला आहे़ रोजगार मिळत नाही़ हजारोंच्या संख्येने आलेल्या मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याच्या सूचना केंद्र तसेच राज्य शासनाने लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यातच दिल्या़ जिल्हा प्रशासनाने त्यानुसार नियोजनही केले़ रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी कामे सुरु करण्यांसदर्भात ग्रामपंचायत स्तरावर तसेच यंत्रणेतील विभाग प्रमुखांशी पत्रव्यवहार केला़ त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर कामे सुरु झाली़ परंतु यंत्रणा स्तरावर एकही काम सुरू झालेले नाही़ यंत्रणेतील विभाग प्रमुख प्रतिसाद देत नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे़ त्यामुळे रोहयो विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करावा लागत आहे़
पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम रोहयो विभाग, जलसंधारण विभाग, वनीकरण, सामाजिक वनीकरण, कृषी या यंत्रणांनी अजुन एकही काम सुरु केले नसल्याने ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे़ या मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे तक्रारी देखील वाढल्या असून त्वरीत कामे सुरु करण्याची मागणी होत आहे़
रोहयो उप जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी पत्रव्यवहार करुन ग्रामपंचायत स्तरावर कामांची संख्या वाढवली आहे़ एप्रिल महिन्यात १२९ कामांवर ६५६ मजुरांची उपस्थिती होती़ आता आठ मेपर्यंत ४०४ कामांवर एक हजार ८९२ मजुरांना रोजगार मिळाला आहे़ ग्रामपंचायत स्तरावर कामांची संख्या चार पटीने वाढली आहे़
धुळे तालुक्यात शंभर कामांवर ४७८ मजुरांची उपस्थिती आहे़ साक्री तालुक्यात १५९ कामांवर ६९६ मजूर, शिंदखेडा तालुक्यात ७७ कामांवर ४४२ मजूर आणि शिरपूर तालुक्यात ६८ कामांवर २७६ मजुरांना काम मिळाले आहे़ ग्रामपंचायत स्तरावरील जलसंधारणाच्या कामांचा त्यात समावेश आहे़ इतर कामांची संख्या जास्त आहे़
परंतु ही कामे वैयक्तीक लाभाची म्हणजे सिंचन विहिरी आणि घरकूल योजनांची कामे असल्याने यात कुटूंबातीलच सदस्यांचे जॉब कार्ड असते़ त्यामुळे गरजू मजुरांना फारसा रोजगार मिळत नाही़
यंत्रणेतील विविध विभागांनी रोहयोची विकास कामे सुरु केली तर त्यात मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत असतो़ त्यामुळे यंत्रणा स्तरावर त्वरीत कामे सुरु करण्याची मागणी होत आहे़
आदेश त्वरीत कामे सुरू करण्याचे
४महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे राज्याचे आयुक्त रंगणायक यांनी गेल्या महिन्यात सर्व जिल्ह्यातील रोहयो उपजिल्हाधिकाऱ्यांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेवून कामे सुरू करण्याचे आदेश दिले होते़
४त्यानुसार रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी यंत्रणांना पत्रव्यवहार करुन कामे सुरू करण्याचे कळविले होते़ परंतु महिना झाला तरी कामे सुरू झाली नसल्याने पुन्हा पत्रव्यवहार केला़
४दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी सर्व तहसिलदारांची बैठक घेवून आपआपल्या तालुक्यात कामे सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ संबंधित तहसिलदार तालुका पातळीवर यंत्रणांच्या विभाग प्रमुखांच्या बैठक घेवून कामे सुरु करण्याचे नियोजन करणार आहेत़
४कृषी विभाग आणि वन विभागाच्या कामांचे प्रस्ताव तयार आहेत़ त्यांच्यासह इतरही विभाग त्वरीत कामे सुरु करणार आहेत़
प्रत्येक तालुक्यात कामे सुरु करण्याच्या सूचना तहसिलदारांना दिल्या आहेत़ त्वरीत कामे सुरु करण्याचे नियोजन केले जात आहे़
- गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी, रोहयो