अमरावती मध्यम प्रकल्पातील पाण्याचे पोटचाऱ्या करून नियोजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:07 IST2021-03-04T05:07:51+5:302021-03-04T05:07:51+5:30
शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी रखडलेली तापी बुराई महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागणेदेखील तेवढेच ...

अमरावती मध्यम प्रकल्पातील पाण्याचे पोटचाऱ्या करून नियोजन करावे
शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी रखडलेली तापी बुराई महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. सध्या थंड बस्त्यात गुंडाळलेल्या या योजनेच्या कामाला गती देऊन तापी, बुराई, अमरावती या नद्यांच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास येथील शेतीला बारमाही कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या दरवर्षी हे प्रकल्प भरतीलच याची श्वाश्वती नसल्यामुळे येथील शेतीचे योग्य नियोजन होत नाही. परिणामी उत्पन्नावर परिणाम होऊन विकास खुंटला आहे.
सन १९८०मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अमरावती मध्यम प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी २००६ वर्षी हा प्रकल्प पूर्ण झाला. प्रकल्प पूर्ण होऊन पहिल्याच वर्षी पूर्ण क्षमतेने भरला, मात्र त्यानंतर एक तप उलटून गेल्यानंतर १३ वर्षांनी येथील नागरिकांना या प्रकल्पात पाणी पाहायला मिळाले. सध्या दोन वर्षांपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून पोटचाऱ्याअभावी येथील पाणी शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरत आहे.
येथील अमरावती मध्यम प्रकल्पाला डावा व उजवा असे दोन कालवे असून, अनुक्रमे डावा कालवा सात किलोमीटर व उजवा कालवा एकूण १४ किलोमीटर लांबीचा आहे, मात्र या कालव्यांना लागून प्रत्यक्ष शेतात पाणी घेऊन जाण्यासाठी ज्या पोटचाऱ्या पाहिजे त्या अद्याप झालेल्या नाहीत तर काही ठिकाणी अस्तित्वात राहिल्या नसल्याचे चित्र असून, या पाण्याचा उपयोग काही शेतकऱ्यांना घेता येत नसल्याचे वास्तव चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
यामुळे पाणी असून, उपाशी राहण्याची वेळ येथील शेतकर्यांवर आली आहे, तर या दोन्ही कालव्यांना प्रचंड गळती पहिल्यापासून आहे. यामुळे लाखो लिटर पाणी दररोजचे वाया जात आहे तरी अद्याप याचे कोणाला सोयरसुतक नसून धरण सुरक्षा समितीचे याकडे दुर्लक्ष का होत आहे हा शोधाचा विषय बनला आहे. नुसता प्रोटोकॉल म्हणून पाहणी होत असते. दोन वर्षांपासून अविरतपणे अखंड रात्र-दिवस या पाण्याची नासाडी होत आहे.