दुचाकीने कट मारल्याने दुसऱ्या दुचाकीवरील दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:38 AM2021-05-06T04:38:35+5:302021-05-06T04:38:35+5:30
धुळे : मागून भरधाव येणाऱ्या मोटारसायकलने कट मारल्याने पुढील मोटारसायकल अपघातग्रस्त होऊन २५ फूट घसरत गेल्याने दोन तरुण जागीच ...
धुळे : मागून भरधाव येणाऱ्या मोटारसायकलने कट मारल्याने पुढील मोटारसायकल अपघातग्रस्त होऊन २५ फूट घसरत गेल्याने दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर पनाखेड गावाच्या शिवारात सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमाराला हा अपघात झाला. एम. एच. १८ एक्स. ०७८१ क्रमांकाच्या भरधाव वेगातील मोटारसायकलने पुढे असणाऱ्या एम. पी. ४६ एम. जी. ५२६१ क्रमांकाच्या मोटारसायकलीस धडक दिली. यामुळे पुढची मोटारसायकल स्लीप होऊन सुमारे २५ फूट घसरत गेली. यात मोटारसायकलवरील दोघांच्या डोक्याला मार लागला. त्यात कुवरसिंग गुलाब धानका (४०) आणि तारासिंग मयाराम धानका (३४), दोघे रा. व्होऱ्यापाणी, ता. शिरपूर हे दोघे जागीच ठार झाले. सांगवीकडून पळासनेरकडे येणारा हा मोटारसायकलस्वार अपघातानंतर पसार झाला.
या अपघातामुळे महामार्गाची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. दरम्यान, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ आणि पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मृतांकडील मोबाइलमध्ये सेव्ह असलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर मृतांची ओळख पटली.
याप्रकरणी गुलाब बाहऱ्या धानका (६२, रा. व्होऱ्यापाणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध मंगळवारी दुपारी भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकाॅन्स्टेबल मांडगे करीत आहेत.