समन्वय ठेवल्यास ‘पॉझिटिव्ह’वर उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 21:41 IST2020-05-30T21:38:50+5:302020-05-30T21:41:39+5:30
संडे अँकर । कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करताना काळजी घेण्याची आवश्यकता, नियोजनाचीही गरज

समन्वय ठेवल्यास ‘पॉझिटिव्ह’वर उपचार!
धुळे : कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे़ मात्र समन्वयाचा अभाव असल्यामुळे त्याचा नाहक फटका रुग्णांना बसत आहे़ समन्वय ठेवल्यास पॉझिटिव्ह रुग्णांवर योग्य प्रकारचा उपचार करता येऊ शकतो़ अशा प्रतिक्रिया शहरात उमटू लागल्या आहेत़
कोरोनासंदर्भात आरोग्य विभागासह प्रशासनाने ही बाब गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे़ रुग्णांचे तपासणी अहवाल तपासत असताना ते निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह याची योग्य रितीने खातरजमा करुनच तो अहवाल प्रसारीत करायला हवा़ त्यासाठी योग्य असा समन्वय राखणे गरजेचे आहे़ लॉकडाउनच्या काळात देखील नागरिकांनी स्वत:हून घरीच थांबणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे़
कंटेन्मेंट झोनचे पालन हवे
शहरातील ज्या भागात कंटेन्मेंट झोन निश्चित करण्यात आलेले आहेत, तेथील निर्बंधाचे पालन तंतोतंत झाले पाहीजे़ कोरोनाच्या या काळात वैद्यकीय सुविधा देणाऱ्यांच्या कामाला खरोखरच सलाम आहे़ मनपा सफाई कर्मचाऱ्यांना देखील योग्य त्या सुविधा पुरविण्याची गरज आहे़ - अनिल मुंदडा
नियोजनाचा अभाव
रुग्ण ज्या प्रमाणात आढळत आहेत, त्या तुलनेत आरोग्य विभागाचे स्वतंत्रपणे नियोजन असायला हवे़ रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी जे नियोजन हवे ते कुठेही दिसून येत नाही़ तातडीने त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे़ असे केल्यास रुग्ण कमी होण्यास निश्चित मदत मिळू शकेल़ - स्त्री रोग तज्ञ
बेजबाबदारपणा थांबवा
कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच कशी, याचा अर्थ कोणत्याही प्रकारचे ठोस नियोजन होताना दिसत नाही़ जिल्हा रुग्णालयातून मेडीकल कॉलेज वेगळे केले तर त्याचा काही उपयोग होईल असे वाटत असताना अपेक्षा फोल ठरत आहेत़ उपचारासोबतच प्रबोधन देखील करणे गरजेचे आहे़ - एक डॉक्टर
हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय तसेच प्रशासन यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे़ पण, तो समन्वय नसल्याचे ऐकिवात आहे़ या समन्वयाच्या अभावामुळे रुग्ण हा उपचार करण्यासाठी टाळतो असे म्हणायला हरकत नाही़ हे कुठेतरी थांबविण्याची आवश्यकता आहे़ मास्क लावणे, सॅनिटायझर करणे, हात धुणे हे प्रत्येकाने करायला हवे़ शासनाने सांगण्यापेक्षा काही निर्बंध आपण स्वत:ला लावून घ्यायला हवे़ - रवी बेलपाठक
कोरोनासारख्या जागतिक आणि अनपेक्षित महासंकटाचे उत्तर केंद्र आणि राज्यसरकारच्या एकत्रित प्रयत्नातूनच शोधता येणार आहे. २ महिन्यापासून सर्व भारतीय घरी राहून आहे आणि म्हणून त्याचा तणाव आता अर्थव्यवस्थेवर जाणवतो आहे. आरोग्य, व्यवसाय, प्रशासन अशा विविध क्षेत्रात अडचणी भरपूर आहेत, परंतु त्या लक्षात आल्यानंतर त्यांना सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. समस्या सोडविण्यासाठी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आत्मनिर्भर व्हा़ - हर्षल विभांडीक