वाहतूक व्यवसाय निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:33 IST2021-04-12T04:33:43+5:302021-04-12T04:33:43+5:30

धुळे : अगोदरच डिझेलच्या वाढत्या दरामुळे हैराण झालेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना आता शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचा फटका बसू लागला आहे. ...

Transport business halved | वाहतूक व्यवसाय निम्म्यावर

वाहतूक व्यवसाय निम्म्यावर

धुळे : अगोदरच डिझेलच्या वाढत्या दरामुळे हैराण झालेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना आता शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचा फटका बसू लागला आहे. गेल्या आठवड्यापासून लागू केलेल्या विविध निर्बंधांमुळे धुळे जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यवसायाला रोजचा किमान ३० ते ४० लाखांचा फटका बसत असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र ट्रक असोसिएशनचे सचिव मनोज राघवन यांनी दिली. गेल्यावर्षी कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक माल वाहतुकीव्यतिरिक्त इतर मालाची वाहतूक बंद असल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसाय जवळपास तीन ते साडेतीन महिने ठप्पच होता. त्यातून सावरत असताना गेल्या काही महिन्यांपासून डिझेलच्या किमतीही गगनाला भिडल्याने, त्याचा फटकाही या व्यवसायाला बसत आहे.

धुळे जिल्हा हा तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने येथे ट्रान्सपोर्ट हा जवळपास मुख्य व्यवसाय आहे. जिल्ह्यात मालवाहतूक करणारी लहान-मोठी अशी पाच ते साडेपाच हजार वाहने आहेत. याच व्यवसायावर अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध, रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. याचा फटकाही या व्यवसायाला बसू लागला आहे. या निर्बंधांमुळे वाहतूक व्यवसाय ५० टक्क्यांवर आला आहे. दुकाने, हाॅटेल्स बंद असल्याने वाहतूकदारांना माल मिळत नाही. माल मिळाल्यास परतीचा माल मिळण्यासाठी एक-दोन दिवसांची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे चालक-सहचालकाला तेथेच थांबून राहावे लागत आहे. गाडी खाली करेपर्यंत संध्याकाळ होते. त्यातच रात्रीची संचारबंदी असल्याने गावाहून निघण्यासाठी चालकांना दुसऱ्या दिवसाचीच वाट बघावी लागते. एकंदरीत या निर्बंधांमुळे वाहतूक व्यवसायाला रोजचा किमान ३० ते ४० लाखांचा फटका बसत आहे.

यामुळे चालकांचे पगार करणे, घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांसाठी जिकरीचे झाले आहे. जोपर्यंत हा व्यवसाय पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत करामध्ये सवलत द्यावी, मोटार व्हेईकल टॅक्समध्ये सवलत द्यावी तसेच कर्जाचे हप्ते बँकेने नंतर वसूल करावेत, असे आदेश शासनाने द्यावेत, अशी मागणी मनोज राघवन यांनी केली आहे.

Web Title: Transport business halved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.