सोयाबीन बियाण्यांचा भाव वाढण्याची शक्यता : कृषी अधिकारी : घरचे बियाणे वापरण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:17+5:302021-04-20T04:37:17+5:30
जिल्ह्यात मागील हंगामात सोयाबीन पीक काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजलेले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या उगवण ...

सोयाबीन बियाण्यांचा भाव वाढण्याची शक्यता : कृषी अधिकारी : घरचे बियाणे वापरण्याचे आवाहन
जिल्ह्यात मागील हंगामात सोयाबीन पीक काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजलेले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधी बियाण्याची घरच्या घरी उगवण क्षमता तपासणी करून घ्यावी. बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असेल, तर पेरणी करावी. ज्या प्रमाणात बियाणाची उगवण क्षमता येईल त्या प्रमाणात पेरणीसाठी बियाण्याचा प्रती हेक्टर वापर करणे योग्य ठरेल. सोयाबीन हे स्वयंपराग सिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या स्व:उत्पादित बियाण्याची उगवण क्षमता तपासून वापर करावा.
तसेच सध्या बाजारात सोयाबीनचा भाव वधारला असल्याने बियाणे कंपन्या देखील सोयाबीन बियाण्याचे दर मागील वर्षापेक्षा जास्त दराने आकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन बाजारात न विकता येत्या खरीप हंगामासाठी राखून ठेवावे. स्वत:ची गरज भागवून देखील बियाणे शिल्लक राहत असेल, तर शिल्लक बियाणे आपल्या मित्रमंडळी, नातेवाइकांना पेरणीसाठी दिल्यास घेणाऱ्या व देणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. शेतकऱ्यांनी वाळलेल्या बियाण्यातील शेंगा, फोलपटे, काडीकचरा, माती, खडे काढून स्वच्छ करावे.
स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या, नवीन पोत्यात साठवून ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते. त्यामुळे साठवणुकीचे ठिकाण थंड किंवा ओलावाविरहित व हवेशीर असले पाहिजे याची काळजी घ्यावी. साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना पोत्यांची थप्पी सात फुटांपेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता घ्यावी. बियाणे १०० किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना चार पोत्यांमध्ये जास्त व ४० किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास आठ पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये, अन्यथा सर्वांत खालच्या पोत्यातील बियाण्यांवर जास्त वजन पडून बियाण्याची उगवण शक्ती कमी होते. पोत्यांची रचना उभ्या-आडव्या पद्धतीने करावी, म्हणजे हवा खेळती राहून बियाण्यांची गुणवत्ता व उगवण शक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार बियाणे साठवणूक केलेल्या खोलीमध्ये कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर करावा. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायकास किंवा कृषी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.