आखाडेत घरोघरी वाटले हातधुण्यासाठी साबण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:58 IST2020-03-21T12:57:46+5:302020-03-21T12:58:29+5:30
उपसरपंचांकडून स्वखर्चातून खबरदारीचा उपक्रम : गावात ‘कुटुंब सुखी तर गाव सुखी’चा देताहेत संदेश

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : साक्री तालुक्यात आखाडे येथे कोरोना विषाणूच्या खबरदारी म्हणून उपसरपंचांनी हात धुण्यासाठी स्वखर्चाने साबण आणून त्याचे घरोघरी वाटप केले. या उपक्रमाचे सध्या कौतुक होत आहे.
आखाडे गावचे उपसरपंच तथा गटनेते शिवलाल शामराव ठाकरे यांनी वैयक्तीक खर्चाने साबण आणून कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला शुक्रवारी सकाळी वितरीत केलेत. आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी. ‘कुटूंब सुखी तर गाव सुखी’ असा संदेश समजावून सांगितला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जनता कर्फ्यु‘स प्रतिसाद देण्याचे देखील आवाहन केले. शिवलाल ठाकरे, रावसाहेब ठाकरे, निंबा नथ्थू ठाकरे, भालचंद्र ठाकरे, किशोर सोनवणे, हरी मोरे, श्रावण भवरे, विकास महिरे, दादाभाई पिंपळे, वामन शिवराम ठाकरे, दौलत ठाकुर, रामजी गजन भील, राजी रामजी भील, जिभाऊ गजमल ठाकरे, गामपंचायत शिपाई लक्ष्मण पिंपळे व रमेश वेंडाईत यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन वाटप केले.
कन्हैयालाल हिंमत ठाकरे याने गलोगल्ली वाटप करतांना ध्वनीक्षेपकावरुन नागरिकांना साबणाने हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन केले. गावातील एकूण ५५० कुटूंबाना प्रत्येकी एक साबणाचे वितरण केले.
दरम्यान ग्रामीण भागातही आता ‘कोरोना’विषयी जनजागृती वाढत चालली आहे. ग्रामस्थही एकमेकांशी हस्तांदोलन करण्याऐवजी ‘नमस्कारा’ला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.