...तर पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर मारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST2021-04-16T04:36:10+5:302021-04-16T04:36:10+5:30
महापालिकेच्या सभागृहात सकाळी सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ ...

...तर पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर मारू
महापालिकेच्या सभागृहात सकाळी सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह स्थायी समिती सदस्य आणि विभाग प्रमुख उपस्थित होतेे. सभेत विषय पत्रिकेवरील पाच विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.
६ एप्रिल रोजी सभापती संजय जाधव यांनी शहरातील पाणी प्रश्नावर बैठक बोलाविली होती. त्यामुळे सभापती जाधव यांनी बैठकीच्या सुरुवातीला सदस्यांना पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी असल्यास मांडण्याची सूचना केली. त्यानंतर उपस्थित सदस्यांनी विस्कळीत पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या कारभारावर चांगलाच रोष व्यक्त केला. नागसेन बोरसे म्हणाले, माझ्या प्रभागात ६ दिवसांआड पाणी येत होते. मात्र, पाणीपुरवठावर बैठक झाल्यापासून ११ दिवस होऊनही पाणी आलेले नाही. पोटतिडकीने बोलणाऱ्या सदस्यांचा अधिकारी असा वचपा काढत असल्याचे दिसत आहे. यापुढे कोणतीही बैठक घेऊ नका. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर कपडे फाटेस्तोवर मारेल. याद राखा, मग त्यानंतर गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
वर्क ऑर्डर का नाही : नवले
पाणी प्रश्नावर सदस्य कायम बोलत असतात. तरीदेखील हा प्रश्न सुटलेला नाही. मनपाने वॉटर कन्सल्टंट नेमण्याबाबत टेंडर काढून दोन महिने झाले. तरीदेखील अद्याप वर्क ऑर्डर दिलेली नाही. दरवेळी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी रोजी दररोज पाणी सोडण्याचे आश्वासन दिले जाते. कारवाई होताना दिसत नाही. दप्तर दिरंगाईमुळे हा प्रश्न सुटत नसल्याचा आरोप शीतल नवले यांनी केला.
बैठक बोलवा : मासुळे
अकरा दिवस होऊनही पाणी आलेले नाही. माझ्या दारात २० ते २२ जणांचा मोर्चा आला हाेता. याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीची बैठक पाणीपुरवठ्याबाबत बोलवावी. तसेच कचराची समस्यासुद्धा बिकट झाली असल्याची तक्रार अमोल मासुळे यांनी सभेत मांडली.
दरम्यान, सदस्यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना अभियंता कैलास शिंदे म्हणाले, आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यातच कोविडचे अतिरिक्त काम सोपविण्यात आले आहे. त्यामुळे काेविडचे काम आमच्याकडून काढून घेण्यात यावे. शुक्रवारी सकाळी ६ वाजेपासून आम्ही सर्व अभियंते केवळ पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करू, असे सांगितले. यावर पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत उपाययाेजना केल्या जातील, असे सभापती संजय जाधव यांनी सांगितले.