धुळे जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींनी स्वच्छता दर्पण स्पर्धेसाठी कंबर कसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 11:51 IST2019-08-08T11:49:54+5:302019-08-08T11:51:28+5:30
गुणांकनासह रॅँकीग ठरणार, गावागावात स्वच्छतेबाबत केली जातेय जनजागृती

धुळे जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींनी स्वच्छता दर्पण स्पर्धेसाठी कंबर कसली
आॅनलाइन लोकमत
धुळे : राष्टÑीयस्तरावरील स्वच्छता दर्पण स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायती सज्ज झालेल्या आहेत. गावातील सर्व कुटुंबाना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छतागृहिंच्या मदतीने जनजागृती, प्रशिक्षण, व घनकचऱ्याचे व्यवस्थापन आदी उपक्रम आहेत. स्पर्धा सर करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी कंबर कसलेली आहे. उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा गौरव केला जाणार आहे. दरम्यान या स्पर्धेतील कामगिरीच्याबाबतीत धुळे जिल्हा राज्यात १२व्या स्थानी असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली.
या स्पर्धेंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून जनजागृती करण्यावर जिल्ह्याचे गुणांकन होणार आहे. स्वच्छता दर्पण ही गुणांकन स्पर्धा असून, शाश्वत स्वच्छतेसाठी शौचालयांचा वापर, स्वच्छतागृही यांची निवड, प्रशिक्षण, व स्वच्छतागृह सक्रीय करणे या बाबी स्पर्धेसाठी महत्वाच्या असणार आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याबाबत गावात जनजागृती करण्यासाठी रंगरंगोटी करण्याचे काम ग्रामपंचायतींना करावे लागत आहे. ‘हगणदारीमुक्त गावात आपले स्वागत’ अशा आशयाचे स्वागत फलक, व लहान मुलांच्या शौचाचे व्यवस्थापन, शौचालयांचा वापर, शौचालय सर्वांसाठी तसेच घनकचरा व्यवस्थापन हे पाच महत्वाचे संदेश गावात रंगविणे गरजेचे आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या नमुना आकार रंगसंगतीप्रमाणे एक स्वागत फलक व चांर भिंती रंगविणे आवश्यक असणार आहे.
अॅपच्या माध्यमातून हे फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहे. या उपक्रमांतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयावर ग्रामीण जनतेचे प्रबोधन होणार आहे. स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या गावांचा सन्मान होणार आहे.
त्यामुळे या स्पर्धेला गती मिळाली असून, गावांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.