शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:33 AM2021-04-14T04:33:00+5:302021-04-14T04:33:00+5:30
गेल्यावर्षीपासून कोरोनाचे वादळ घोंगावतेय. गेल्यावर्षीही ऐन परीक्षेच्या काळातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा कहर ...
गेल्यावर्षीपासून कोरोनाचे वादळ घोंगावतेय. गेल्यावर्षीही ऐन परीक्षेच्या काळातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा कहर कायम असल्याने, यावर्षी शाळा सुरू होण्यास तब्बल जानेवारी महिन्याची वाट बघावी लागली. अनेक शाळांमध्ये ॲानलाईन उपक्रम सुरू असला तरी तो नावालाच होता.
दरम्यान, फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, ज्या शाळा सुरू झाल्या होत्या, त्या देखील बंद झाल्या. दरम्यान, जेवढा कालावधी शाळा सुरू होता, त्याकाळात काही शाळांनी चाचणी परीक्षा घेतल्या. ॲानलाईन अभ्यास घेतला. एवढी तयारी केल्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासनाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थी वर्गातही काहीशी नाराजी आहे. शाळास्तरावर ॲानलाईन परीक्षा घेणे सहज शक्य आहे. मात्र, शाळांनीही हात झटकल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परीक्षा रद्द झाल्या तर गुणवत्ता कशी समजणार, असा प्रश्न आहे.
शाळास्तरावर चाचणी परीक्षा घेतली तर ॲानलाईन परीक्षा घेण्यात कुठलीही अडचण यायला नको. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे अयोग्य आहे. त्यामुळे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ॲाफलाईन शक्य नसल्याने, ॲानलाईन घेतली पाहिजे. अे.पी.जोशी
माजी प्राचर्य पालेशा शिक्षणशास्त्र महाविद्यालय
कोरोनाचे संकट असल्याने, शिक्षण विभागाने पुन्हा एकदा परीक्षा रद्द केलेल्या आहेत. मग ॲानलाईन शिक्षणाचा उपयोग काय झाला? ते समजेनासे आहे. किमान शाळा स्तरावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ॲानलाईन पद्धतीने घेऊन गुण दिल्यास विद्यार्थ्याची प्रगती समजू शकेल.
- संभाजी पाटील,
पालक,
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला असला तरी शेवटी विद्यार्थ्यांची प्रगतीही महत्त्वाची आहे. परीक्षा रद्द होत असल्याने, त्यांच्यातील अभ्यासाची गोडी कमी होईल. त्यामुळे ॲाफलाईन परीक्षा तरी झाल्याच पाहिजे. तरच त्याचा फायदा होईल.
- एस.बी. कुळकर्णी,
पालक,
राज्यात कोरोनाचे संकट अतिशय गडद झालेले आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत. मात्र सलग दोन वर्षांपासून विद्यार्थ्याच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठविले जात आहे. मात्र ही ढकलगाडी काय कामाची, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.