पाण्यासाठी दाही दिशा, तरीही कौतुकाचा वर्षाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST2021-04-23T04:38:16+5:302021-04-23T04:38:16+5:30

स्थायी समिती सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्थायी समिती सदस्य यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठ्यावर बैठक पार पडली़ यावेळी ...

Right direction for water, yet a shower of appreciation! | पाण्यासाठी दाही दिशा, तरीही कौतुकाचा वर्षाव!

पाण्यासाठी दाही दिशा, तरीही कौतुकाचा वर्षाव!

स्थायी समिती सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्थायी समिती सदस्य यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठ्यावर बैठक पार पडली़ यावेळी नगरसचिव मनोज वाघ, अभियंता कैलास शिंदे आणि अभियंते उपस्थित होते़

पाण्यावर काथ्याकूट

गेले पंधरा दिवसांपूूर्वी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीपुरवठा विषयावर नगरसेवकांनी काथ्याकूट करीत विषय अक्षरश: ताणून धरला होता़ तास दोन तास होऊनही निर्णय लागत नसल्यामुळे स्थायी समिती सभापती संजय जाधव यांनी पाणीपुरवठाचे नियोजन आणि वितरणावर विशेष बैठक घेण्याचे आदेशित केले होते़

इशाऱ्यानंतर बैठक

परिणामी पाणी विषयावर स्वतंत्र बैठक लावण्यात आली होती़ त्यात नेहमीप्रमाणे पाणी विषयावर आगपाखड झाली़ १० ते १५ दिवस होऊनही पाणी येत नसल्याने नगरसेवकांनी नाराजी दर्शविली होती़ काहींनी तर पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा सज्जड इशारा देऊन मोकळे झाले होते़ आरोप-प्रत्यारोपांच्या या बैठकीत चर्चा करण्यात आली आणि अन्य सर्व कामे बाजूला सारून सर्व अभियंते पाणी विषयावर लक्ष केंद्रित करतील असे आश्वासन दिले़ त्यानुसार, काम मार्गी लावण्यात सुरुवात झाली़

केवळ २० टक्के काम

कुठे १० ते १२ दिवसांआड येणारे पाणी चार दिवसांआड येण्यास सुरुवात झाली़ अशी स्थिती एकीकडे असताना मात्र हे काम केवळ २० टक्केच पार पडले आहे़, ही वस्तुस्थिती माहीत असतानादेखील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचा गवगवा करून काही नगरसेवकांनी प्रशासनावर थेट कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली़ अजूनही पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे ८० टक्के काम बाकी असल्याचे त्यांना बहुधा माहितीच नसल्याचे बैठकीत अधोरेखित होत होते़ तरीदेखील कौतुकांचा वर्षाव मात्र मनमुरादपणे प्रशासनावर होत असल्याचे बैठकीतच वारंवार स्पष्ट होत होते़

वर्ष उलटले, तरीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता़ सर्वांना आपापल्या घरात थांबण्याचे एकप्रकारे आदेशित करण्यात आले होते़ नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालनदेखील केले होते़ पण, नळाला पाणीच नाही तर आम्ही जीवन जगायचे कसे? कोरोनापेक्षा पाणी असूनही कृत्रिम टंचाईमुळे आपण मरू की काय असे वाटल्याने नागरिक एकवटले आणि प्रशासनावर पाण्यासाठी मोर्चा काढण्यात आला़ एकत्र आल्याने त्यांच्यावर गुन्हादेखील झाला होता़ तातडीने हा प्रश्न मार्गी लावून नागरिकांची पाण्यासाठी भटकंती थांबेल असे वाटत असताना आता वर्ष उलटले, तरीदेखील त्याच नागरिकांचा तोच पाण्याचा प्रश्न अजून सुटला नसल्याचे बैठकीत पुन्हा समोर आले़

प्रशासनाकडून सारवासारव

पाणी वितरणात अडचणी आल्याचे सांगत मनुष्यबळाचा अभाव, जुनाट झालेली मशिनरी, खंडित असलेला विद्युत पुरवठा आणि पाईपलाईनची गळती अशी कारणे प्रशासनाकडून सांगण्यात आली़ यावर कामकाज सुरू असल्याचेही सांगून मोकळे झाले़ तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे़ अभियंता आणि व्हॉलमनला सूचना केलेल्या आहेत़ लिकेज दुरुस्तीचे काम मार्गी लावले जात असल्याचेही सांगण्यात आले़

बैठक अक्षरश: गुंडाळली

पाणीपुरवठ्याच्या विशेष बैठकीत काहीतरी ठोस चर्चा होईल, पाण्याचे समप्रमाणात वितरण होण्यासाठी त्याचे नियोजन केले जाईल, पाणी वितरणात काय चूक होत आहे हे समजून घेऊन ठोस निर्णय होईल असे वाटत असताना तसे काही झाले नसल्याचे बैठकीत समोर आले़ सर्वांचे ऐकून घेत बैठक संपली अशी औपचारिकता पूर्ण करीत सभापती जाधव यांनी बैठकीचे कामकाज संपविले़

Web Title: Right direction for water, yet a shower of appreciation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.