विक्रेत्यांचे स्थलांतर म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST2021-04-18T04:36:11+5:302021-04-18T04:36:11+5:30
धुळे : बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांचे विविध भागांत स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी विक्रेते मात्र पुन:पुन्हा ...

विक्रेत्यांचे स्थलांतर म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी...
धुळे : बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांचे विविध भागांत स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी विक्रेते मात्र पुन:पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी जात आहेत. त्यामुळे भाजीपाला आणि फळेविक्रेत्यांचे स्थलांतर म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी... असे म्हणण्याची वेळ आली आहे.
१५ दिवसांच्या लाॅकडाऊनमध्ये जीवनावश्यक असल्याने भाजीपाला आणि फळे विक्रीला मुभा दिली आहे; परंतु पाचकंदील आणि आग्रा रोडवर भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची तर गर्दी आहेच; पण भाजीपाला खरेदीसाठीही सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. बाजारात येताना नागरिक मास्क वापरत असले तरी सोशल डिस्टन्सिंग मात्र पाळत नाहीत. काहीजण मास्कचा वापर आदर्श पद्धतीने न करता केवळ पोलिसांना घाबरून देखावा म्हणून मास्क लावून फिरतात. नागरिकांच्या अशा बेजबाबदार वागण्याचे परिस्थिती गंभीर होऊ शकते. शनिवारी तब्बल ११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
स्थलांतरित जागेवर धंदा होईना...
बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पाचकंदील आणि आग्रा रोडवरील भाजीपाला आणि फळविक्रेत्यांचे वेगवेगळ्या भागांत स्थलांतर करण्यात आले. परंतु विक्रेते पुन्हा पुन्हा पाचकंदील आणि आग्रा रोडवर धाव घेत आहेत. पोलीस आणि पालिकेच्या पथकाने पाठ फिरवल्याबरोबर हे विक्रेते स्थलांतरित जागेवरून नेहमीच्या ठिकाणी जातात. ग्राहकांना देखील कोरोनाचा संसर्ग आणि शासन-प्रशासनाच्या नियमांचे सोयरसुतक नसल्याचे दिसते. कोरोना झाल्याशिवाय हे लोक घरात स्वस्थ बसणार नाहीत, अशा प्रतिक्रिया आहेत. दरम्यान, प्रशासनाच्या सूचनेनुसार एका प्रामाणिक विक्रेत्याने क्युमाईन क्लबजवळ भाजीपाल्याची हातगाडी लावली; परंतु या ठिकाणी ग्राहक फिरकलेच नाहीत. त्यामुळे त्याचा धंदा बुडाला.
स्थलांतरित केले तरीदेखील काही विक्रेते पाचकंदील चाैकातच व्यवसाय करण्यासाठी येत आहेत.