वीजबिल न देताच महावितरणची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:29+5:302021-03-18T04:36:29+5:30
धुळे : जिल्ह्यात अनेक कृषिपंपधारक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे वीजबिलच मिळाले नाही. असे असताना महावितरण कंपनीने वसुली जोरात सुरु केली आहे.वसुलीसाठी ...

वीजबिल न देताच महावितरणची वसुली
धुळे : जिल्ह्यात अनेक कृषिपंपधारक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे वीजबिलच मिळाले नाही. असे असताना महावितरण कंपनीने वसुली जोरात सुरु केली आहे.वसुलीसाठी महावितरण कपंनीने कृषी वीज धोरण अंतर्गत निर्लेखन, व्याज आणि विलंब आकारात सुट देवून थकबाकी पुनर्गठीत केली आहे. जिल्ह्यात कृषिपंपांची १३१० कोटी ३३ लाख थकबाकी होती. सुट दिल्यानंतर ती ८३० कोटी ५९ लाख झाली आहे. मार्च २०२२ पर्यंत दोन टप्प्यात वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल ५० टक्के बिल माफची योजना महावितरणने सुरु केली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार २१२ शेतकऱ्यांनी ९ कोटी ३१ लाख रुपये वीजबिल भरले आहे. वसुली जोरात सुरु आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांना वीजबिल मिळत नव्हते. परंतु गावातील वायरमनकडे थकबाकीदारांची यादी देवून घरोघरी वीजबिल भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अचानक सुरु झालेल्या वसुलीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. - सुभाष शिंदे, शेतकरी उडाणे
अनेक वर्षांपासून नियमीत वीजबिल मिळत नसल्याने कीती थकबाकी आहे हे कळलेच नाही. परंतु आता अचानक घरी निरोप दिला की कार्यालयात जावून वीजबिल घ्यावे आणि भरावे. अचानक पैसे कुठून उभे करायचे अशी चिंता आहे. - एस. पी. सोनवणे, शेतकरी, चिलाणे
कृषि पंपाचे वीजबिल मिळाले आहे. यापूर्वी वेळोवेळी बिल देखील भरले आहे. आता महावितरण कंपनीने वसुलीसाठी योजना सुरु केली असून, शेतकऱ्यांनी वीजबिल भरले तर त्यांना मोठ्या प्रमाणात सुट मिळणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा. - दलपत राठोड, शेतकरी, तांडा कुंडाणे
अनेक शेतकरी मोबाईल नंबर देण्यास कचरतात. अनेकांची नंबर आणि पत्ता चुकीचा दिला आहे. त्यामुळे वीजबिल मिळत नसेल. शेतकऱ्यांनी कार्यालयात जावून वीजबिलाविषयी माहिती घ्यावी आणि भरणा करावा. वीजबिलात सवलत दिली जाणार आहे. - प्रकाश पाैनीकर, अधीक्षक अभियंता.