रात्री विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST2021-04-19T04:33:20+5:302021-04-19T04:33:20+5:30
विनाकारण शहरात वावर शहरात संचारबंदी लावूनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे वर्दळीवरुन समोर येत आहे़ कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन असतानाही ...

रात्री विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका
विनाकारण शहरात वावर
शहरात संचारबंदी लावूनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे वर्दळीवरुन समोर येत आहे़ कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन असतानाही बिनधास्तपणे फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही़ पोलीस देखील ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेतच दिसत असल्याने बहुधा त्याचा फायदा अनेकांकडून घेतला जात असल्याचे स्पष्ट आहे़ दिवसांप्रमाणे रात्री देखील फिरणारे दिसून येत असल्याने शहरातील प्रमुख चौकांमध्ये बॅरिकेट्स लावून विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून अडविण्यात येत आहे़
अन्यथा, गुन्हे नोंदविण्याचा इशारा
शहरातील संतोषी माता चौक, कराचीवाला खुंट, गांधी पुतळा, पारोळा रोड, साक्री रोड, फाशी पूल, रेल्वे स्टेशन परिसर, बारापत्थर आदी भागात शनिवारी रात्री पोलिसांच्या गस्ती पथकाद्वारे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी प्रयत्न झालेत़ विनाकारण घराबाहेर पडल्यास नाईलाजाने कारवाई करावी लागेल, अशी समज देत नागरिकांना सोडण्यात आले असले तरी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तसेच गुन्हा नोंद होऊ शकते़ याची जाणीव त्यांना करुन देण्यात येत होती़
आग्रा रोडवर सामसूम
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर बहुतांश व्यापाऱ्यांनी संचारबंदीच्या आदेशाचे पालन करीत आपापली दुकाने बंद ठेवल्याने आग्रा रोडवर सामसूम पहायला मिळाली़ शुकशुकाट असतानाही फिरणारे काही कमी होताना दिसून येत नाही़ आग्रा रोड, पारोळा रोडच्या क्रॉसिंगवर थांबून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना रविवारी दुपारी पोलिसांनी जाब विचारला़ दोन ते तीन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी शहरातील पारोळा रोड, कराचीवाला खुंट, महात्मा गांधी पुतळा परिसरात जाऊन पाहणी केली़ विनाकारण फिरणाऱ्यांना त्यांनी जाब विचारला होता़ त्याचवेळेस पोलिसांना पाहून काहींनी आपला मार्ग बदलून घेणे पसंत केले़ यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे होते़