अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी जागा पडतेय अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST2021-04-16T04:36:23+5:302021-04-16T04:36:23+5:30
मालपूर येथील अमरावती नदी काठावरील, रामी, खोक्राडे रस्त्यावरील फाट्यावर अमरधाम आहे. मालपूर गाव मोठे असून एकाच वेळी ...

अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी जागा पडतेय अपूर्ण
मालपूर येथील अमरावती नदी काठावरील, रामी, खोक्राडे रस्त्यावरील फाट्यावर अमरधाम आहे. मालपूर गाव मोठे असून एकाच वेळी दोन घटना झाल्या तर मृतावर शेवटचा संस्कार करण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून सुमारे ९ लाख १८ हजार खर्चून वाढीव नवीन अमरधामचे नवनिर्माण केले. यात नवीन दहन ओट्याचादेखील समावेश आहे. मात्र हे अमरधाम सध्या अपुरे पडत असून दिवसाला चार ते पाच व्यक्तींवर अंतिम संस्कार करण्याची दुर्दैवी वेळ मालपूरकरांवर आली आहे. अंतिम संस्कार कुठे करावेत, अशी तेथील विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
मालपूरसह ग्रामीण भागात मृतांवर अंतिम संस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या जागेवर जाऊन पाणी शिंपडून शांत केले जाते व अस्थी गोळा केल्या जातात. विधीवत पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी मंगळवार व रविवार येत असेल तर तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम होत असतो. तो पर्यंत त्या जागेवर दुसऱ्याचा अंतिमसंस्कार करत नाही. यामुळे जागा अपुरी पडत असून यासाठी आता येथील अमरधामच्या पुढे, पाठीमागील जागेवर जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी जागा तयार करावी.
मालपूर येथील अमरधाममधील आतील भागात सामाजिक संघटनांनी वृक्षारोपण करून संगोपनदेखील केले आहे; मात्र जागाच पुरेशी उरत नसल्यामुळे अंतिमसंस्काराच्या वेळी या वृक्षांना आगीच्या ज्वाळांची झळ पोहचून ही झाडे सुकून जात असल्याचेदेखील दिसून येत असल्यामुळे पर्यायी जागा करणे गरजेचे आहे.
११ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास एकाच वेळी तेथे दोन मृतदेह दाखल झाल्यामुळे शासनाने घालून दिलेले २० लोकांचे निर्बंध तसेच या अमरधामला वाल कंपाऊंड असल्यामुळे सोशल डिसटन्सिंगचे पालन करणे जिकिरीचे झाले होते.
तसेच येथे हायमास्ट लाईट गाडून तयार आहे. लाख रुपये खर्चून येथे तो पोल उभा केला आहे; मात्र अजून वर्षभरापासून त्या पोलवर वायरअभावी दिवा, लाईट चमकू शकला नसल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता तरी सध्या ची परिस्थिती बघता ग्रामपंचायत प्रशासनाने येथे त्वरित विजेची सोय करावी. कारण मृतावर रात्री-अपरात्री अंतिम संस्कार करावे लागत असल्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या कामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी बॅनर, पाॅम्प्लेटवर फोटो असणाऱ्या पॅनल प्रमुखांनी लक्ष घालावे, अशीदेखील मालपूरकर ग्रामस्थांची मागणी आहे.
प्रतिक्रिया.......
अमरधाम येथे हायमास्ट उभा आहे; मात्र वर्षभरापासून चमकू शकला नाही ही ग्रामपंचायत प्रशासनाची शोकांतिका म्हणावी लागेल. अमरधाम येथे मृतावर अंत्यसंस्कार करायला जागा अपुरी पडत असून युवा नेते, प्रेरणास्थान, पॅनल प्रमुख कुठे गायब झाले आहेत, दिसत नाही. सध्या तुमची गावाला गरज असून रस्त्यावर उतरून गावकऱ्यांना मदत करा.
प्रफुल्ल खंडेराव
मालपूर ग्रामस्थ