मोलकरणींना अनेक दरवाजे बंद, कुटुंबाचा गाडा कसा चालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST2021-04-15T04:34:39+5:302021-04-15T04:34:39+5:30
कोरोनाच्या वाढत्या विषाणू संसर्गाने आता रौद्ररूप धारण केलेले आहे. दररोज तीनशेच्या पुढेच कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने, प्रशासनाकडून सुरक्षेच्या ...

मोलकरणींना अनेक दरवाजे बंद, कुटुंबाचा गाडा कसा चालणार
कोरोनाच्या वाढत्या विषाणू संसर्गाने आता रौद्ररूप धारण केलेले आहे. दररोज तीनशेच्या पुढेच कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने, प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सुरू झालेले आहे. अशातच काहींनी मात्र भीतिपोटी मोलकरणींसाठी काही दिवसांपुरते दरवाजे बंद केले आहेत.
घराघरात कुणी भांडी धुण्याचे काम, तसेच स्वयंपाकाचे काम करून काही मोलकरीण महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. मात्र, कोरोनामुळे आता त्यांच्यावरही संकट निर्माण झालेले आहे.
अशा संकटाच्या काळात काहींनी मोलकरणींना सुट्टी दिल्याने, त्यांना काम शोधण्याची वेळ आलेली आहे.
एका घरी काम करून साधरणत: हजार ते बाराशे रुपये मिळतात. एक मोलकरीण साधारणत: चार-पाच घरी काम करीत असते. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग वाढल्याने, काही घरांनी तूर्त काम बंद केले आहे. त्यामुळे आता घरी बसून राहण्याशिवाय पर्याय नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.
एका घरातून मिळतात ५०० ते ७०० रुपये
धुळे शहरात मोलकरणींची संघटना नाही. त्यामुळे त्यांना प्रत्येक घरातून ठरावीक रक्कम मिळेल असे नाही. जसे घर व कामाचे स्वरूप असेल, त्यानुसार त्यांना पैसे मिळत असतात. मात्र, धुणीसाठी ५०० व भांडी घासण्यासाठी ५०० रुपये महिना घेतला जातो. फरशी पुसायची असल्यास त्याचेही वेगळे पैसे लागतात. एक मोलकरीण महिला पाच-सहा घरी काम करीत असते.
गेल्या चार वर्षांपासून मी घरोघरी धुणी भांडीचे काम करते. त्यातून चांगला रोजगार मिळत होता. मात्र, आता लॉकडाऊनमुळे काहीं घरांचे काम बंद झाले असून, मोजकेच घरे बाकी आहे. त्यामुळे आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे
वंदना इंगळे
मागील वर्षीही लॉकडाऊन असल्याने, अनेक घरांमधील काम बंद झाले होते. परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाल्यानंतर लोकांकडील घरकाम सुरू झाले. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन लागल्याने, कुटुंबाचा उदरनिर्वाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.
कमला सोनवणे
सुरुवातीला पाच-सहा घरी काम करता यायचे. त्यामुळे चांगले पैसे मिळायचे. आता लॅाकडाऊनमुळे अडचण आलेली आहे. त्यामुळे काही घरांनी तूर्त काम बंद केले आहे.
रंजना पाटील
घर कसे चालवायचे?
काही महिन्यांपासून महागाई गगनाला भिडलेली आहे. त्यातच आता कामाचे संकट निर्माण झालेले आहे. अशा परिस्थितीत घर कसे चालवायचे, हा प्रश्नच आहे. त्यामुळे शासनाने आम्हालाही मदत करावी.