धुळे : महापालिकेचा निष्क्रीयपणा आणि लचके तोडणाऱ्या प्रशासनामुळे धुळ्यात कोरोनाचा फैलाव होत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक, भाजप नेते मनोज मोरे यांनी केला आहे़ त्यांनी केलेल्या या आरोपामुळे भाजपलाच त्यांनी घरचा आहेर दिल्याचे स्पष्ट होत आहे़धुळे शहरात कोरोना या महामारीने अतिशय मजबूत असे जाळे विणले आहे़ या भयंकर परिस्थितीतून धुळेकर नागरिकांना सांभाळण्याची प्रमुख जबाबदारी महापालिकेची आहे़ परंतु या विषयात पूर्णपणे अयशस्वी झाली असून यास सर्वस्वी पालिकेचे प्रशासन जबाबदार आहे़ शहरात कोरोना या महामारीशी लढण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना सुरू आहेत, त्यात फवारणी करणे, परिसर निजंर्तुक करणे, परिस्थतीनुसार हॉटस्पॉट किंवा कॅन्टेन्मेंट झोन तयार करणे, भागाभागात बॅरिकेटिंग करणे हे जरी सर्व होत असेल तरी देशाच्या पंतप्रधानांपासून राज्याच्या मुख्यमंत्री ते पालिका प्रशासन जनतेत वेळोवेळी अणि परत परत हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करत आहेत़ त्यात आपल्या महापालिकेचाही जोर स्वच्छ हात धुण्यावर जास्त आहे़ परंतु खेदाने सांगावेसे वाटते की धुळे शहराच्या जनतेला ८ ते १० दिवस नळांना पाणी देत नाही़ जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी महापालिका हाल करते आहे़ तर मग जनता हात कसे धुणार? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला़ शहराला पाणी पुरवठा करणारे स्तोत्र कोरडे आहेत त्यामुळे महापालिका पाणी देऊ शकत नाही, अशीही परिस्थिती नाही़ उलट गेल्या वर्षी वरुण राज्याच्या कृपेने खूप पाऊस झाला़ सर्व नद्या, नाले, तलाव, बंधारे, धरण ओसंडून वाहिले व आजही या वर्षी पाऊस झाला नाही तरी पाणीटंचाई भासणार नाही़ अशी परिस्थिती आहे़ नकाने तलावात खूप पाणी आहे़ अक्कलपाडा धरण या वर्षी पहिल्यांदा ओसंडून वाहत आहे़ तिखी आणि नकाणे तलावात भरपूर प्रमाणात पाणीसाठी उपलब्ध आहे़ तरी देखील धुळेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ नागरिक वेळेवर टॅक्स भरतात़माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरिष महाजन, जयकुमार रावल, डॉ़ सुभाष भामरे यांनी कायम पाणीटंचाईला कंटाळलेल्या जनतेला विश्वास देऊन रोज पाणी देण्याचे आश्वासन दिले होते़ व जनतेनेही नेत्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत कधी नव्हे इतकं घवघवीत ५० पेक्षा अधिक नगरसेवक भाजपच्या पारड्यात टाकून धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासह नागरी सुविधांच्या अपेक्षा केल्या आहेत़ त्यामुळे जनतेत नेत्याविषयी व पक्षा विषयी नाराजीचा सूर उमटत असून भाजपही इतर पक्षासारखाच खोटे आश्वासन देणारा पक्ष असल्याच्या भावना जनतेच्या होऊ लागल्या आहेत़ त्यामुळे भाजपा पक्ष देखील बदनाम होतो आहे, अशी आक्रमक भावना मोरे यांनी व्यक्त केली आहे़
मनोज मोरेंकडून भाजपला घरचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:21 IST