३०० एकर बागायतीसह ४०० विहीरी जीवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:24 IST2019-12-01T12:24:05+5:302019-12-01T12:24:55+5:30
संडे अँकर । श्रमदानातून तयार झाला चिमठाणे गाव तलाव तर जलयुक्त शिवार योजनेतून बांधला बंधारा

Dhule
शिंदखेडा : तालुक्यातील चिमठाणे पिंपरी शिवारातील नाल्यावर १९७२ मध्ये बंधारा बांधण्यात आला होता. मात्र सदर बंधाऱ्यात गाळ साचून नादुरुस्तही झाला होता. दोन वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी श्रमदान केले. तसेच माजी कृउबा सभापती इंद्रसिंग गिरासे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कुटुंबांनी श्रमदानाला आर्थिक मदत दिली. यामुळे काहीअंशी बंधारा दुरुस्त झाला. पूर्ण दुरुस्तीसाठी सुमारे २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता होती. ती आमदार जयकुमार रावल यांनी जलयुक्त शिवार योजनेतून पूर्ण करून बंधारा पूर्ण करण्यात आला. त्यामुळे चिमठाणे पिंपरी शिवारातील सुमारे ३०० एकर शेती ओलिताखाली येणार असून सुमारे ४०० शेतीच्या विहिरी तुडूंब भरल्या आहेत. नुकतेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मावळदे यांनी भेट देऊन या कामाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
१९७२ च्या दुष्काळात सदर गाव तलावाचे काम झालेले होते. दोन वर्षापूर्वी चिमठाणे येथील स्व.इंद्रसिंग गिरासे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कुटुंबाने स्वखर्चाने पाच लाख रुपये खर्चून तलावाची दुरुस्ती केली होती. त्यावेळी ग्रामस्थांचाही सहभाग होता. त्यानंतर माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी चिमठाणे व पिंपरी या दोघा गावांचा २०१९-२० या वर्षाच्या जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट केल्याने सदरील गाव तलावाचे कामासाठी सुमारे २५ लाख रुपयांची तरतूद करून काम करण्यात आले असून सदरचे काम हे अत्यंत चांगल्या दर्जाचे झाल्याने चिमठाणे, दलवाडे प्रसो, पिंपरी या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असून सुमारे तीनशे एकर जमीन बागायती पाण्याखाली येणार आहे.
सदर कामाच्या पाहणीदरम्यान लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता दुसाने, उपअभियंता जे.वाय. पाटील, सहाय्यक अभियंता ए.बी. पाटील, चिमठाणाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच खंडू भिल, विरेंद्रसिंग गिरासे, आरावेचे प्रथम लोकनियुक्त सरपंच कैलास गिरासे, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र गिरासे, बापू धनगर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.