हरिण संवर्धनाच्या उपक्रमांबाबत उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 00:34 IST2017-04-20T00:34:28+5:302017-04-20T00:34:28+5:30

शहादा तालुक्यातील काळवीट दिसेनात : वनविभागाकडून कारवाई शून्य

Indifference to deer promotion activities | हरिण संवर्धनाच्या उपक्रमांबाबत उदासिनता

हरिण संवर्धनाच्या उपक्रमांबाबत उदासिनता

नंदुरबार : पाच हजार ३५ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील दोन हजार ३९२ चौरस किलोमीटर वनक्षेत्रावरील वनक्षेत्रात तृणभक्षक अर्थात हरिणवर्गीय प्राणी नसल्याचे वनविभागाला निदर्शनास आले आहे़  गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील वनांमधून नाहिशा झालेल्या तृणभक्षी प्राणी वाढीसाठी वनविभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही़ 
वनविभागाकडून जिल्ह्यातील वनक्षेत्रात  दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना करण्याची परंपरा आहे़ मे महिन्यातील बुद्ध पौर्णिमेला ही गणना होणार आहे़ मात्र तत्पूर्वी वनविभागाकडून माहिती जाणून घेतली असता, आजअखेरीस नंदुरबार जिल्ह्याच्या वनांमध्ये एकही तृणभक्षी अर्थात हरिणवर्गीय प्राणी आढळून आलेला नाही़ अत्यंत चिंताजनक असलेल्या या अहवालामुळे जिल्ह्यातील प्राणीसंपदा धोक्यात असल्याचे स्पष्ट होऊन ठोस उपाययोजना होत नसल्याने प्राण्यांचे भवितव्य अंधारात आहे़

मे महिन्यातील बुद्ध पौर्णिमेला होणार प्राणीगणना
वनविभागाकडून येत्या बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्ह्यातील नंदुरबार आणि मेवासी वनक्षेत्रातील नैसर्गिक, कृत्रिम पाणवठे, वन्यप्राण्यांचे रस्ते याठिकाणी दुपारी १२ ते रात्री १२ यावेळेत ही प्राणी गणना करण्यात येणार आहे़
गेल्यावर्षी २१ मे रोजी राबवलेल्या नवापूर, नंदुरबार व चिंचपाडा या वनक्षेत्रात बिबट, तरस, कोल्हे, साळींदर हे प्राणी आढळून आले होते़  या वनक्षेत्रात रानडुकरांचाही संचार दिसून आला होता़ मात्र तृणभक्षक प्राणी आढळून आलेला नसल्याचा अहवाल आहे़ तळोदा व अक्कलकुवा मेवासी वनक्षेत्रात अस्वल, बिबट्या, रानडुकरे यांचा संचार आहे़ वनविभागाकडून शहादा वनक्षेत्रात राबवलेल्या प्राणीगणना कार्यक्रमातही तृणभक्षी हरिणवर्गीय प्राणी आढळले नसल्याची माहिती आहे़ राणीपूर वनक्षेत्रात जंगली ससा हा एकमेव तृणभक्षी प्राणी दिसून आल्याची माहिती आहे़ सातपुड्यातील धडगाव तोरणामाळ परिसरातही हरिणवर्गीय प्राणी नसल्याची माहिती गेल्यावर्षाच्या प्राणीगणनेत समोर आली होती़ 
जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षात वाहनाच्या धडकेत आठ तर आजारपणामुळे दोन असे १० तरस मयत झाल्याची माहिती आहे़ यातील किमान आठ तरस हे तळोदा वनक्षेत्रातील आहेत़

नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या डोंगररांगांपासून ते गुजरात हद्दीलगत नवापूर तालुक्यातील वनक्षेत्रापर्यंत नीलगाय, चौसिंगा, काळवीट, हरिण, भेकर हे हरिणवर्गीय प्राणी आढळून येत होते़ या प्राण्यांना लागणारे अन्न हे दिवसेंदिवस कमी होत गेल्याने त्यांची संख्या कमी होऊन त्यांनी स्थलांतर केले़ वनांमध्ये आतल्या भागापर्यंत वाढलेली गुरे चराई, कमी झालेले पाणवठे, नाहिसे होणारे आसरे, वनांमध्ये लागणाºया आगी यामुळे अन्न कमी झाले आहे़ या प्राण्यांचे होणारे स्थलांतर ही मांसभक्षी प्राण्यांची अन्नसाखळी तुटण्याची शक्यता निर्माण करत असल्याने या तृणभक्षक असलेल्या हरिणांची संख्या वाढवण्याच्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे़
जिल्ह्यात आजघडीस नंदुरबार आणि नवापूर तालुक्याच्या विविध भागात तीन बिबटे असल्याची माहिती आहे़ या बिबट्यापैकी मादी बिबट्याचा प्रजननाचा काळ असल्याने या बिबट्यांच्या संख्येत वाढ होणार आहे़ याचप्रमाणे तळोदा आणि शहादा तालुक्यात बिबट्यांचा संचार आहे़ मात्र त्यांची संख्या अद्याप समोर आलेली नाही़ धडगाव, अक्कलकुवा व तोरणमाळ परिसरातील बिबट्याच्या संख्येबाबत वनविभाग साशंक आहे़


गेल्यावर्षी शहादा तालुक्यात सारंगखेडा व अनरद बारी या दरम्यान शिरपूर रस्त्यालगत ६ ते ७ काळवीटांचा कळप सातत्याने दिसून येत होता़ या परिसरातच चिंकारा प्रजातीचे हरिणही दिसून येत होते़ मात्र जानेवारी पासून या प्राण्यांचा मागमूसही या भागात लागलेला नसल्याची माहिती स्थानिक शेतकरी देत आहेत़ हे तृणभक्षक प्राणी हरभरा, गवत आणि इतर शेतीपिकांवर गुजराण करत होते़ मात्र आता ते या भागात दिसून येत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे़
नंदुरबार तालुक्यातील काही भागात काळवीट दिसून आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते़ रब्बी हंगामात दररोज दिसून येणारे काळवीट आता पाण्यावरही येत नसल्याचे आष्टे, अजेपूर, श्रीरामपूर या भागातील शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ नवापूर तालुक्यात गुजरात सीमेवर असलेल्या गावांमध्ये  गुजरात राज्यातील डांगच्या जंगलातून येणारे भेकराचे कळप दिसून आल्याची माहिती शेतकºयांनी दिली आहे़ गेल्या दोन महिन्यांपूर्वी भेकराचे पिलू आढळून आल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती आहे़
मे महिन्यात येणाºया बुद्ध पौर्णिमेला चंद्राचा प्रकाश सरळ असतो, उन्हाळ्यात पाणवठ्यांची संख्या कमी होऊन प्राण्यांचा संचार वाढतो़ सरळ पडणाºया चंंद्रप्रकाशामुळे जमिनीवर प्राण्यांचे पदचिन्ह हे सहजपणे ओळखता येत असल्याने वनविभाग प्राणीगणना करणार असल्याची माहिती आहे़   वनविभागाकडून यंदा नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम व अतीदुर्गम भागातील ९६ बीटवर मचाण तयार करून, गस्त पद्धतीने, जंगलात कॅमेरे लावून प्राणी गणना करण्यात येणार आहे़

Web Title: Indifference to deer promotion activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.