धुळे जिल्ह्यावर घोंगावतेय चक्रीवादळाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 14:18 IST2020-06-02T14:18:15+5:302020-06-02T14:18:36+5:30
जिल्हा प्रशासन : चार जूनला पहाटेपासून ते सकाळी दहापर्यंत असेल सक्रीय

dhule
धुळे : गुजरात राज्याच्या किनारपट्टीवरुन येणारे चक्रीवादळ एक ते चार जून दरम्यान धुळे जिल्ह्यातुन जाण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. सदर कालावधीत वा-याचा वेग खुप जास्त असुन मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़
चार जून रोजी पहाटे चार वाजता साक्री म्हसदी वरून लामकानी ,चिमठाणे मार्गे सकाळी आठ वाजेच्या दरम्यान वर्शी, थाळनेर, लामकानी, चिमठाणे मार्गे त्याच दिवशी सकाळी नऊला शिंदखेडा, जैतपूर वरुन शिरपूर , सुळे मार्गे सकाळी १० वाजता खरगोण, मध्य प्रदेशकडे सरकणार आहे़
आपले गाव वरील ठिकाणांपासून १५० ते २०० किमी च्या आत असल्यास आपल्याकडेही ०३ जुनच्या पहाटे पासून ६ जूनच्या सायंकाळपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे़
निसर्ग चक्रीवादळ आणि अतीवृष्टीच्या दरम्यान नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आवश्यक सूचना जारी केल्या आहेत़ मच्छीमार व अन्य व्यक्तींनी नदीमध्ये जावु नये, मंगळवार ते गुरुवार या कालावधीत कोणीही आपले घर सुरक्षित असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये, आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तात्काळ सुरक्षीत स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवुन स्थलांतरीत व्हावे, घराच्या अवती भोवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विेजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासून लांब रहावे, आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे, आपले जवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात, हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडीओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात, सोबत आवश्यक अन्नधान्य पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवा, आपला जिव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य दयावे, पिण्याचे पाणी शुध्दीकरण करुन वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे, सदयस्थितीत जिल्हयात विलगीकरणात असलेले नागरीक व चक्रीवादळाचे पार्श्वभुमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवतांना एकमेकांत मिसळणार नाहीत याची दक्षता घ्यावी, मदत आवश्यक असल्यास ग्रामपंचायत, तहसिलदार कार्यालय, जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02562- 288066 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे़