बिनधास्त जनतेपुढे पोलिसांची हतबलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST2021-03-17T04:36:58+5:302021-03-17T04:36:58+5:30
(देवेंद्र पाठक) कोरोनाचा काळ अजिबात संपलेला नाही़ उलट रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे़ त्या अनुषंगाने मास्क लावणे, गर्दी ...

बिनधास्त जनतेपुढे पोलिसांची हतबलता
(देवेंद्र पाठक)
कोरोनाचा काळ अजिबात संपलेला नाही़ उलट रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे़ त्या अनुषंगाने मास्क लावणे, गर्दी न करणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे अशी त्रिसूत्रींचा अवलंब करण्याचे निर्देश शासन स्तरावरून पारित झाले़ त्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे़ असे असताना केवळ नियमांचे पालन होते आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी शेवटी पोलिसांना पार पाडावी लागत आहे़ त्यासाठी शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर उभे राहन पोलिसांकडून मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे़ समोर पोलीस दिसताच काही जण आपल्या दाढीवरचा मास्क तोंडावर घेतात़ त्यानंतर तोच मास्क पुन्हा दाढीवर लावला जातो़ यात पोलीस काहीच करू शकत नाही़त जनतेने समजूतदारपणा दाखविला तर पोलिसांकडून कारवाई करण्याची वेळ येणार नाही़ पण, बिनधास्त जनतेपुढे शेवटी पोलिसांची हतबलताच दिसून येते़ जी कारवाई मुळात व्हायला नको त्यासाठी पोलिसांची निम्मी ताकद उगाच खर्च होताना दिसून येत आहे़ असे का होते, नागरिकांकडून नियमांचे पालन का केले जात नाही, याचे आत्मपरीक्षण होणार कधी? हा अनुत्तरित असा प्रश्न आहे़
तसेच क्षुल्लक कारणावरून हाणामारी होण्याचे प्रमाण आता धुळ्यात जास्त प्रमाणात घडताना दिसून येत आहे़ हाणामारीप्रसंगी त्यांच्याकडे तलवारीसारखे घातक शस्त्र येते कुठून, हादेखील विचार करायला लावणारा प्रश्न आहे़ याचा अर्थ घातक असे शस्त्र काही ठिकाणी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते़ देवपूर परिसरात नुकत्याच झालेल्या हाणामारीत तलवारीचा वापर करण्यात आला़ यात दुखापत झाली असून तलवारीचा घाव जीवावर बेतला आहे़ या पार्श्वभूमीवर आता शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्याची वेळ आलेली आहे़ अशा प्रकारची मोहीम अचानक राबविल्यास विविध प्रकारची घातक शस्त्रे पोलिसांच्या हाती लागू शकतात, असा अंदाज आहे़