संचारबंदीतही मुक्त संचार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST2021-04-17T04:36:05+5:302021-04-17T04:36:05+5:30
शासनाने ५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या निर्बंधानुसार ३० एप्रिलपर्यंत रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत जारी असलेली संचारबंदी, ...

संचारबंदीतही मुक्त संचार सुरूच
शासनाने ५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या निर्बंधानुसार ३० एप्रिलपर्यंत रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत जारी असलेली संचारबंदी, शॉपिंग मॉल व व्यापारी संकुलातील जीवनावश्यक, तसेच वैद्यकीय सेवेशी संलग्न दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. गुरुवारी दुपारपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली़ निर्बंध असलेल्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बारपत्थर, आग्रा रोड, गल्ली नंबर ४, ऊसगल्ली आदी भागात पथकाने फिरून दुकाने बंद केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका बसू लागल्याने राज्य शासनासह स्थानिक प्रशासनदेखील अलर्ट झाले आहे़ १५ दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे़ संचारबंदी लागू केल्यामुळे बाजारातील गर्दी कमी होईल आणि वाढत असलेली कोरोना रुग्णांची चेन ब्रेक होईल असा त्या मागचा उद्देश आहे़ मात्र, याच उद्देशालाच धुळेकरांनी हरताळ फासल्याचे सर्वत्र दिसून येत आहे़ दिवसेंदिवस बाधितांचे आकडे शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात वाढत आहे़ रुग्ण संख्या ६०० पार झाली आहे़ धुळ्यातील आरोग्य यंत्रणा अत्यंत बिकट परिस्थितीत काम करीत आहे़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटिलेटर शिल्लक नाहीत़ अनेक रुग्णांलयांमध्ये ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी कोरोनाबाधितांसह त्यांच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागत आहे़ ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव जात असूनही धुळेकर ऐकायला तयार नसल्याचे समोर येत आहे़
पाचकंदील गजबजला
वीकेंड लॉकडाऊनचा दुसरा आठवडा असल्याने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बाजारपेठ संपूर्णपणे बंद राहणार असल्याने भाजीपाल्यासह किराणाच्या दैनंदिन वस्तू घेण्यासाठी अनेकजण बाजारपेठेत दाखल झाले होते़ परिणामी दुकानांमध्ये नेहमीपेक्षा अधिकची गर्दी दिसून आली़, तर दुसरीकडे याच पाचकंदील चौकात गुरुवारी फळविक्रेत्यांना रस्त्याच्या बाजूला हटविले होते़ पुन्हा तेच फळविक्रेते रस्त्यावर आल्याने पोलिसांनी त्यांना पुन्हा बाजूला हटवत तंबी दिली आहे़ पुन्हा रस्त्यावर आले आणि गर्दी होत असल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देण्यात आला़
विनाकारण शहरात वावर
शहरात संचारबंदी लावूनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे़ त्यात जुनी महापालिका परिसर, जे़ बी़ रोड, पाचकंदील परिसर, खोल गल्ली, गांधी पुतळा, दत्त मंदिर, वाडीभोकर रोड, साक्री रोड, स्टेशन परिसर, आदी विविध ठिकाणी नागरिक विनाकारण फिरताना दिसून आले़ महापालिकेच्या जुन्या इमारतीजवळ पोलीस बंदोबस्त असतानादेखील फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसून आली नाही़
(कोटसाठी)
कोरोनाची साथ अतिशय घातक असल्याने त्याचा सामना हा संयम आणि नियमांचे पालन करूनच केली जाऊ शकतो़ नागरिकांनी मास्क वापरावा, हात वारंवार साबणाने धुवावे़ सोशल डिस्टन्सिंग पाळावे़ शासन नियमांचे पालन करावे़ संचारबंदी असल्याने विनाकारण फिरू नये़ असे कोणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल़
- चिन्मय पंडित
पोलीस अधीक्षक, धुळे