ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:35 IST2021-03-20T04:35:28+5:302021-03-20T04:35:28+5:30
सध्या मालपूर तालुका शिंदखेडा परिसरात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. गेल्या शुक्रवारी तर मध्यरात्री प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होऊन ढगांचा ...

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावला
सध्या मालपूर तालुका शिंदखेडा परिसरात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. गेल्या शुक्रवारी तर मध्यरात्री प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होऊन ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट झाला. यामुळे शेतातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकाचा घास हातातोंडाशी आल्याने संकटात सापडला होता. मात्र, वातावरण तूर्त निवळल्याने तेव्हा दिलासा मिळाला; मात्र परत याच स्वरूपाचे वातावरण दिसून येत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
या दिवसाचा पाऊस १० मिनिटांत होत्याचे नव्हते करतो, असे जाणकार शेतकरी सांगतात. तर शेत शिवारात या वर्षीचा रब्बी हंगामातील सर्वच हंगाम तयार झाला असून काही ठिकाणी प्रत्यक्ष काढणीला सुरुवातदेखील झाली आहे. मात्र, शेतशिवारात उघड्यावरील शेती उत्पादने असल्याने काय झाकावे आणि काय सोडावे यामुळे नुकसान हे होणारच असल्याने शक्यतो हार्वेस्टर मशीनने तयार गहू काढून घरादारात टाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडताना दिसून येत आहे. यामुळे दररोज सकाळी या मशीनच्या अवतीभोवती शेकडो शेतकरी जमताना दिसून येत आहेत.
.
मजुरांच्या साहाय्याने गहू कापणी करून त्यांचे पुळे बांधणे. यानंतर संपूर्ण एका ठिकाणी गोळा करून ट्रॅक्टर यंत्राच्या साहाय्याने काढणे. यासाठी वेळ व मजुरीचा खर्च वाढतो. याला फाटा देत हार्वेस्टरने सरळ गव्हाचे उत्पादन वाहनात टाकून बाजारपेठेत घेऊन जाता येते व यासाठी एकराला अवघी तीस मिनिटे लागतात. सध्या मालपूर परिसरात या यंत्राचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.