अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:40 IST2021-08-28T04:40:06+5:302021-08-28T04:40:06+5:30
यावर्षी दहावीसाठी २८ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा न झाल्याने, अंतर्गत मूल्यमापनावरच निकाल जाहीर ...

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
यावर्षी दहावीसाठी २८ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा न झाल्याने, अंतर्गत मूल्यमापनावरच निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे २८ हजार ५६५ पैकी २८ हजार ५६१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले होते. निकालाची टक्केवारी ९९.९८ टक्के एवढी होती.
दरम्यान, निकाल मोठ्या प्रमाणात लागल्याने, अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला होता; मात्र उच्च न्यायालयाने अकरावीसाठी सीईटी रद्द केल्याने माध्यमिक शिक्षण विभागातर्फे अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. टक्के चांगले असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे कल आहे.
शहरात विज्ञान शाखेच्या ५२००, कला शाखेच्या १९६० तर वाणिज्य शाखेच्या ४०० जागा आहेत.
२० ते २४ ऑगस्ट दरम्यान अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली होती. २७ रोजी सकाळी ११ वाजता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
येथील जयहिंद वरिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान शाखेची गुणवत्ता यादी ९१ टक्क्यांवर तर वाणिज्य शाखेची गुणवत्ता यादी ९० टक्क्यांवर क्लोज झाल्याची माहिती प्राचार्य डॅा.पी.एच. पवार यांनी दिली. या महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी १४०० तर वाणिज्य शाखेसाठी ५०० जणांनी नोंदणी केलेली होती. या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या ३६० व वाणिज्य शाखेच्या २४० जागा आहेत तर कला शाखेच्या १२० जागा आहेत.
शहरातील एसएसव्हीपीएसच्या घोगरे विज्ञान महाविद्यालयात ११वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ७० टक्यांवर क्लोज झाली. या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या अनुदानित ४४० व विनाअनुदानितच्या २२० जागा आहेत. या महाविद्यालयात प्रवेशासाठी १२०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती, अशी माहिती प्राचार्य एम.व्ही.पाटील यांनी दिली.
यादी बघण्यासाठी गर्दी
अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर होणार असल्याने, सकाळपासून विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात गर्दी केेली होती. अनेक विद्यार्थी पालकांसह महाविद्यालयात दाखल झाले होते. ही यादी ऑनलाइन तसेच महाविद्यालयात दर्शनी भागात फलकावर लावण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून येऊन यादीत आपले नाव आहे का ते शोधले.
गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना २७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.