शौचालय रस्त्यावरील पसरलेल्या घाणीमुळे महिलांची कुचंबणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:28 IST2019-11-23T11:27:46+5:302019-11-23T11:28:28+5:30
वराहाची दुर्गंधी : काटेरी झुडपांनी वेढले; फरशी झाली निसरडी

Dhule
मालपूर : हगणदारी मुक्त मालपूर गावात महिला शौचालयाच्या समस्यांनी त्रस्त असून वॉर्ड क्र. ३ मधील शौचालयाच्या रस्त्यावर प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथून चालणे देखील अशक्य असून रस्त्यावरच शौचालयाच्या पायऱ्यांवर वराह मृत्यूमुखी पडल्याने दुर्गंधी येत असल्यामुळे येथून जाणे देखील मुश्कील झाले आहे. यामुळे शनि मंदिर परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. याबाबत दखल घेणे गरजेचे आहे.
मालपूर हे हगणदारीमुक्त गाव असून ‘स्वच्छ आणि हगणदारीमुक्त गावात आपले सहर्ष स्वागत आहे’ अशा आशयाचे फलक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक सभागृहाच्या बाहेरील भिंतीवर लावण्यात आले आहे. मात्र येथील महिला शौचालयाच्या समस्यांनी त्रस्त आहेत.
मालपूर येथील वॉर्ड क्र. ३ मधील शनिमंदिर परिसरातील महिलांची प्रचंड कुचंबणा होत आहे. येथे अमरावती नदीच्या काठावर सार्वजनिक शौचालये असून त्यांची दुर्दशा झालेली आहे. काटेरी झुडपात वेढले गेले असून तेथे जाणेच सध्या अशक्य असल्याचे दिसून येत असून महिलांच्या तक्रारी आहेत.
शौचालयात जाणे तर सोडा मात्र शौचालयाजवळ जाणे देखील रस्त्यावरील प्रचंड घाणीच्या साम्राज्यामुळे जिकिरीचे आहे. विठ्ठल मंदिर व सावता महाराज मंदिर दरम्यान समोरील रस्त्यावरुन या शौचालयाकडे जाण्याचा रस्ता असून सध्या या रस्त्यावरुन जाणे अशक्य आहे.
या रस्त्यावर दगड फरशी असून गटारी तुडूंब भरल्यामुळे गटारीतील बेसुमार पाणी फरशीवरुन वाहत असते. आजुबाजूला काटेरी झुडपे यामुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य असून चालणे धोक्याचे झाले आहे. सतत पाणी वाहत असल्यामुळे दगडी फरशी निसरडी झाल्याने पडून गंभीर दुखापत होण्याचा धोका आहे तर आज २१ नोव्हेंबर रोजी या शौचालयाच्या पायऱ्यांवर वराह मरुन पडल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरुन येथे उभे राहणे देखील मुश्कील असल्याच्या महिलांच्या तक्रारी होत्या. यामुळे येथील महिलांची प्रचंड कुचंबणा होत असून याची त्वरित दखल घ्यावी, अशी तेथील महिलांची मागणी आहे.
वॉर्ड क्र. २ मध्ये देखील इंदिरा नगर भागातील जलकुंभ परिसरातील महिला या अमरावती मध्यम प्रकल्पाकडे जाणाºया रस्त्यावर उघड्यावर बसत असल्याचे विदारक चित्र दिसून येत असून महिला शौचालयाच्या समस्यांन ग्रस्त असून याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी येथील महिलांची मागणी आहे.