धुळेकरांना पडला कोरोनाचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:35 IST2021-03-20T04:35:32+5:302021-03-20T04:35:32+5:30
लॉकडाऊननंतर नियम व अटींवर व्यवहार सुरळीत झाल्याने शहर पुन्हा गजबजू लागले आहे़ त्यामुळे शहरातील अनेक भागांतील रस्त्यावर ...

धुळेकरांना पडला कोरोनाचा विसर
लॉकडाऊननंतर नियम व अटींवर व्यवहार सुरळीत झाल्याने शहर पुन्हा गजबजू लागले आहे़ त्यामुळे शहरातील अनेक भागांतील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे़ शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आतापर्यंत १९३३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे़ तर ३९५ कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे़ शहरात कोरोनाचा संर्सग रोखण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे़ तरीही नागरिकांना शिस्त लागत नसल्याचे दिसून येत आहे़
शहरात वाहतुकीला बंदी घालण्याची गरज
व्यावसायिकांना सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची सहसा सकाळी ११ ते सांयकाळी ५ पर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मनपाने जुन्या आग्रारोडवर किमान तात्पुरती व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे़ त्याचप्रमाणे आग्रारोडवर रिक्षा, चारचाकी व अवजड वाहनांना काही दिवसांसाठीतरी बंदी करणे आवश्यक आहे़ बाजारात दुचाकी व चारचाकी वाहने रस्ता अडवितात़ त्यामुळे बाजारात खेरदीसाठी आलेल्या नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होते़ त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही़
आग्रा रोडलगत असलेल्या बोळींमध्ये, महापालिकेच्या आवारात तसेच मनपा शाळा क्रमांक पाच, जिल्हा बँकेच्या मागील बाजूच्या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मनपाने पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे़
शुक्रवारी बाजारात गर्दी
लाॅकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी नागरिकांनी खरेदीसाठी जुना आग्रा रोड, पाच कंदील, पारोळारोड, कराचीवाला खुंट अशा परिसरात सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती़ याचवेळी महाराणा प्रताप चौक ते फुलवाला चौक परिसरात गर्दीत चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती़ त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. खरेदीसाठी आलेले अनेकजण विनामास्क बिनधास्त फिरताना आढळून आले़. महापालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे. आग्रारोडवरील दुकानांसमोर लागलेली दुचाकी वाहने, विक्रेत्यांनी लावलेल्या हातगाड्या, लोखंडी जाळ्या, भररस्त्यात लावण्यात आलेल्या रिक्षा व चारचाकी वाहने, दुकानांचे फलक, कमानी यामुळे पार्किंगचा प्रश्न बिकट होऊन बसला आहे़
डिस्टन्स ठेवण्याची गरज
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क व किमान अंतर ठेवण्याची गरज आहे़ मात्र, बहुसंख्य व्यक्ती आजही रस्त्यावर बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.
२२०० कोरोना मुक्त
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र, दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील लक्षणीय आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.