वाहतूक सुरळीत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST2021-07-26T04:32:58+5:302021-07-26T04:32:58+5:30
खड्ड्यांमुळे मंदावला वाहतुकीचा वेग धुळे : राष्ट्रीय महामार्गांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. धुळे - सुरत महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे ...

वाहतूक सुरळीत करण्याची मागणी
खड्ड्यांमुळे मंदावला वाहतुकीचा वेग
धुळे : राष्ट्रीय महामार्गांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. धुळे - सुरत महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. लहान-मोठ्या पुलांचे बांधकामदेखील अपूर्णावस्थेत आहे. कोंडाईबारी घाटातदेखील जीवघेणे खड्डे आहेत. महामार्ग चाैपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
कार्यालयांमध्ये बेशिस्त पार्किंग
धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये बेशिस्तपणे पार्किंग केल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे; मात्र ही जागा अपूर्ण पडत आहे. काहीजण अध्यक्षांच्या दालनाजवळच वाहने उभी करतात. त्यामुळे अडचण होत असते. या ठिकाणी अजून पार्किंगची जागा वाढवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
ग्रामीण भागातही निर्बंध; अंमलबजावणी नावाला
साक्री : अनलॉक झाल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातही व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. मात्र डेल्टा प्लसचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत. याची ग्रामीण भागातही प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने सायंकाळी ४ वाजताच बंद करण्याचे आदेश आहेत; परंतु ग्रामीण भागात या नियमांची कठोर अंमलबजावणी होताना दिसत नाही.
शहरातील चाैक हायमास्टने उजळले
धुळे : शहरातील विविध चाैकातील हायमास्ट दिवे काही महिन्यांपासून बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य होते; परंतु आता शहरातील या मोठ्या दिव्यांची दुरुस्ती झाल्याने चाैक उजळले आहेत. नवीन महानगरपालिकेसमोर असलेले हायमास्ट दिवे अनेक दिवसांपासून बंद होते. त्यामुळे या भागात अंधार होता. महापालिकेसमोरील हायमास्ट बंद असल्याने, ते सुरू करावेत, अशी मागणी होती. अखेर या हायमास्टच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून हा मुख्य चाैकही उजळला आहे.
शिंदखेड्यात मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण
शिंदखेडा : शहरातील बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच भाजीपाला व फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला असून, वाहतुकीला अडथळा होतो. अतिक्रमण काढण्याची गरज आहे.