तिसऱ्याच पावसात डेडरगाव तलाव ‘ओव्हरफ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 13:23 IST2020-06-19T13:18:18+5:302020-06-19T13:23:52+5:30
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस : रानमळा धरण भरण्यास सुरुवात, मालपूर परिसरात दमदार हजेरी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात मंगळवारी रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, धुळे तालुक्यातील तिखी येथील डेडरगाव तलाव पहिल्यांदाच तिसºया पावसात ‘ओव्हर फ्लो’ झाला. यामुळे रानमळा धरण भरण्यास सुरुवात झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी सुखावले आहेत.
१५ वर्षात प्रथमच निसर्ग चमत्कार
वडजाई- धुळे तालुक्यातील तिखी येथील डेडरगाव तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. गेल्या १५ वर्षात प्रथमच अवघ्या तीन दिवसाच्या मुसळधार पावसात सांडवा वाहून निघाला आहे. यामुळे आता रानमळा तलाव भरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच परिसरातील विहिरींचा जलस्तर वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्यावर्षी डेडरगाव तलाव ओसंडून वाहत होता. त्यामुळे तलावाची पाण्याची पातळी पाहिजे तेवढी कमी झालेली नव्हती. यावर्षी गावागावात पाणीटंचाई नसल्यामुळे तलावातून पाण्याचा उपसा पाहिजे तेवढा झालेला नाही. त्यात यावर्षी पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीलाच हजेरी लावली होती. १३ व १४ जून रोजी रात्रीच्या सुमारास सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने तलाव सांडव्यापर्यंत भरला होता.
अखेर १६ रोजी रात्री झालेल्या मुसळधार पाऊसात डेडरगाव तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला. त्यातून निघणारा पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे रानमळा धरणही भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवसात रानमळा धरणाचा सांडवाही वाहून निघेल, अशी शक्यता आहे.
गेल्या पंधरा वर्षात प्रथमच तीन दिवस झालेल्या पावसात डेडरगाव तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाल्याचे चमत्कार पहायला मिळाला. यावर्षी जून महिन्यातच सर्व लहान मोठे के.टी. वेअर भरून ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या विहीरींना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, डेडरगाव तलावाचा सांडवा लवकर वाहून निघाल्यामुळे शेतकरी वर्गात आनदांचे वातावरण दिसून येत आहे.
अर्थे परिसरात जोरदार पाऊस
अर्थे- शिरपूर तालुक्यातील अर्थे परिसरात मंगळवारी रात्री समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली आहे.
अगोदरच अनेक संकटांचा सामना करणाºया शेतकºयांनी कोरोनाच्या संकटातही शेतीची कामे पूर्ण केली. जून महिन्यात सुरुवातीला आलेल्या पावसामुळे शेतकºयांनी आर्थिक गणित जुळवित पेरणीला सुरुवात केली आहे. यावर्षी शेतकरी पावसाळा सुरू होण्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. सर्व शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे होते. अखेर पावसाचे आगमन होताच शेतकरी आनंदित झाले. शेतकºयांनी बी-बियाण्यांची व्यवस्था करून पेरणीला सुरुवात केली. यावर्षी कपाशी, तूर, ज्वारी, मका आदी पिकांच्या पेरणीला सुरुवात केली आहे. तसेच अर्थे परिसरात शेतकºयांनी मका पिकाला पसंती दिली असल्याचे दिसून येत आहे.
अर्थे परिसर कापूस या पिकाकरिता प्रसिद्ध आहे; परंतू यावर्षी अवकाळी पाऊस, गारपीट पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कापूस विक्रीचे खूपच हाल झाल्याने कापसाचे क्षेत्र घटले आहे. परिसरात कापूस हे महत्त्वाचे पीक ओळखल्या जाते. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे हे पीक संकटात सापडले असून या पिकाला पाणीही जास्त लागते व खर्च जास्त होतो.
अर्थे परिसरात पहिल्याच पावसामुळे शिरपूर पॅटर्नअंतर्गत बंधारे भरले असून नाल्यांना पूर आल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
मालपूर परिसरात दमदार हजेरी
मालपूर- शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरात रविवारी सायंकाळी व मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या दमदार पावसानंतर अखेर पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. मालपूरसह परिसरातील सुराय, चुडाणे, कलवाडे, कर्ले, परसोळे आदी गावाच्या शेतशिवारात पेरणीची लगबग सुरु असल्याचे दिसून येत आहे.
या पावसाच्या अगोदरच बागायती कापूस लागवड येथे पूर्ण झाली होती तर कोरडवाहू कापुस लागवड रविवारी झालेल्या पावसानंतर पुर्णत्वास आल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर्षी येथे कापूस लागवड क्षेत्रफळात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मृग नक्षत्रात पावसाने हजेरी दिल्यामुळे व सुरुवातीचा पाऊस देखील दमदार झाल्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मृगाची पेरणी असेल तर संपूर्ण हंगाम चांगले उत्पादन देऊन जातो, असे येथील जाणकार शेतकºयांनी सांगितले.
यामुळे कडधान्यात मुग, उडीद तर खरिपातील भुईमूग शेंगाचा पेरा देखील बºयापैकी होतांना दिसून येत आहे. भुईमूग पेरणीयोग्य पाऊस झाला असून रविवारी व मंगळवारी झालेल्या पावसामुळे जमिनीत चांगला ओलावा आला आहे. वैशाखच्या उन्हात तावून सुलाखून निघालेल्या जमिनीत मृगाच्या पाण्यामुळे चांगला रेशमी पोत आला असून काही शेतकºयांनी सरळ फिफन पांभर ठेऊन प्रत्यक्ष पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. तर काही शेतकरी निंदणीचा खर्च वाचावा म्हणून शेताला वखरणी केल्यानंतर काही शेतकºयांचा पेरणी करण्याचा बेत दिसून येत आहे.
भुईमूग, मुग, उडीद आदी पिकाच्या पेरणीची कामे पूर्ण झाल्यानंतर भुसारातील बाजरी, ज्वारीची पेरणी केली जाते, हे कमी दिवसाचे व कमी पाण्याचे पिक असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
काही ठिकाणी खरिपातील कांदा लागवडीसाठी क्षेत्र सोडले आहे. अशा ठिकाणी कांद्याचे रोप टाकण्याच्या हालचाली देखील होतांना दिसून येत आहे. ही रोपे महिना सव्वा महिन्यानंतर तयार झाल्यावर कांद्याची लागवड केली जाते. मात्र, त्यासाठी रोप टाकणे आवश्यक असते. विकतच्या रोपांची कांदा लागवड परवडत नाही, असे काही शेतकºयांनी सांगितले. एकूणच दोन दिवसांच्या या पावसामुळे येथे खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतशिवार गजबजू लागले आहे तर गावे दुपारच्या सुमारास ओस पडलेली दिसून येतात.