परीक्षा रद्द करणे हा पर्याय असू शकतो का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST2021-04-19T04:33:24+5:302021-04-19T04:33:24+5:30
गेल्या वर्षभरापासूनच कोरोनामुळे शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झालेला आहे.दोन वर्षांपासून पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षाच नसल्याने, विद्यार्थ्यांनाही आपली ‘प्रगती’किती हे ...

परीक्षा रद्द करणे हा पर्याय असू शकतो का?
गेल्या वर्षभरापासूनच कोरोनामुळे शिक्षणाचा पार बट्ट्याबोळ झालेला आहे.दोन वर्षांपासून पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षाच नसल्याने, विद्यार्थ्यांनाही आपली ‘प्रगती’किती हे समजेनासे झालेले आहे. गेल्यावर्षी ॲानलाइन अभ्यासक्रम राबविण्यात आला. मात्र त्यात कोणी किती साध्य केले हा संशोधनाचा विषय आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत समजू शकतो. मात्र दहावीकडे विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष म्हणून बघितले जाते. त्यामुळेच विद्यार्थीही जीवापाड मेहनत करून अभ्यास करीत असतात. जास्तीत जास्त गुण मिळवून अकरावीला चांगल्या शाखेत, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा हाच त्यामागचा उद्देश असतो. यावर्षी २९ ए्प्रिलपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने या परीक्षा तूर्त पुढे ढकलल्या आहेत. मात्र या परीक्षा होणार असल्याने काहीसा दिलासा आहे.
मात्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सरसकट दहावीच्या परीक्षा रद्द करून टाकल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कसे मूल्यमापन होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण अकरावीच्या शाखांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. त्यामुळे परीक्षा देऊन जास्त गुण मिळविणाऱ्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुणांकनांच्या आधारे गुण मिळाल्यास त्यांना पुढील शाखेत प्रवेश घेण्यास अडचण येऊ शकते. यात विद्यार्थ्यांचेच नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त असतानाही येथील शासनाने
दहावीच्या परीक्षा उशिराने का होईना त्या घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. तसा निर्णय सीबीएसईलाही घेता आला असता. मात्र त्यांनी सरसकट दहावीची परीक्षाच रद्द करून एकप्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे असे म्हणण्यास वाव आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर परीक्षेची तयारी केली होती. आणि शेवटी परीक्षा नाही होणार म्हटल्यास त्यांच्यातही नाराजी निर्माण होणे साहजिकच आहे. त्यामुळे सीबीएसईने बारावीची परीक्षा ज्या प्रमाणे तूर्त स्थगित करून नंतर घेण्याचा निर्णय घेतला, तसाच दहावीच्या बाबतीतही निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते. अजूनही वेळ गेलेली नाही सीबीएसईने जूनमध्ये नाही तर जुलैमध्ये दहावीच्या परीक्षा घ्याव्यात, पण परीक्षा रद्द करू नये असेही काही पालकांचे म्हणणे आहे. बारावीच्या परीक्षा उशिराने होऊ शकतात, तर दहावीच्या का नाहीत असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे.