‘कोरोना’ने महानगरातील वर्दळ थांबवली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST2021-04-16T04:36:12+5:302021-04-16T04:36:12+5:30
शासनाच्या आदेशानुसार, राज्यात बुधवारी (दि. १४) रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे़ तरीही रस्त्यांवर नागरिक बिनधास्तपणे फिरताना आढळून ...

‘कोरोना’ने महानगरातील वर्दळ थांबवली !
शासनाच्या आदेशानुसार, राज्यात बुधवारी (दि. १४) रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे़ तरीही रस्त्यांवर नागरिक बिनधास्तपणे फिरताना आढळून आले़ मुख्य बाजारपेठ सोडली तर कॉलनी परिसरात आणि दाट वस्तीच्या गल्ल्यांतही सर्व काही सुरू असल्याचे दिसून आले़
लॉकडाऊनचा फायदाच काय?
कोरोनाच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेले आहे़ यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही विनाकारण फिरता येणार नाही़ त्यांच्यावर निर्बंध लावत सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली आहे़ त्याची अंमलबजावणी धुळ्यात होत आहे़; पण अपेक्षित प्रमाणावर त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे पुन्हा पुन्हा समोर येत आहे़ संचारबंदी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आग्रा रोडवर सामसूम आढळून आली़; पण, त्याच्यापुढे असलेल्या पाचकंदिल चौकात विक्रेत्यांसह नागरिकांची वर्दळ दिसून आली़
विनाकारण शहरात वावर
शहरात संचारबंदी लावूनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे वर्दळीवरून समोर येत आहे़ कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन असतानाही बिनधास्तपणे फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही़ पोलीसही ठरावीक ठिकाणी आणि ठरावीक वेळेतच दिसत असल्याने बहुधा त्याचा फायदा अनेकांकडून घेतला जात असल्याचे स्पष्ट आहे़ विविध ठिकाणी गर्दी दिसून येते़ त्यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे़
आग्रा रोडवर सामसूम
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर बहुतांश व्यापाऱ्यांनी संचारबंदीच्या आदेशाचे पालन करीत आपापली दुकाने बंद ठेवल्याने आग्रा रोडवर सामसूम पाहायला मिळाली़ तरीही आग्रा रोड, पारोळा रोडच्या क्रॉसिंगवर थांबून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी जाब विचारला़
... अन्यथा, गुन्हे नोंदविण्याचा इशारा
शहरातील संतोषी माता चौक, कराचीवाला खुंट, गांधी पुतळा, पारोळा रोड, साक्री रोड, फाशी पूल, रेल्वे स्टेशन परिसर, बारापत्थर आदी भागांत पोलिसांच्या गस्ती पथकाद्वारे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी प्रयत्न झाले. विनाकारण घराबाहेर पडल्यास नाइलाजाने कारवाई करावी लागेल, अशी समज देत नागरिकांना सोडण्यात आले असले तरी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तसेच गुन्हा नोंद होऊ शकतो, याची जाणीव त्यांना करून देण्यात येत होती़