घरकुलांसाठी मनपाला केंद्राच्या निधीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 22:37 IST2020-03-07T22:37:05+5:302020-03-07T22:37:50+5:30
लाभार्थी चिंतेत : सत्ताबदलानंतर राज्याचा निधी मिळाला,मात्र चार महिन्यापासून केंद्राचा निधीच मिळाला नाही

dhule
धुळे : पंतप्रधान घरकूल योजनेतील ५०४ लाभार्थ्यांनी मनपाकडे प्रस्ताव सादर केले होते़ त्यापैकी १५४ घरकुलाच्या लाभार्थ्यांना केद्र व राज्य शासनाकडून तिसऱ्या टप्प्याचे १ कोटी १८ लाख रूपये अनुदान देण्यात आले आहे़ दरम्यान सत्ता परिवर्तनानंतरही राज्याकडून मिळणारा घरकुलाचा निधी मनपाला प्राप्त झाला आहे़ मात्र चार महिन्यापासुन केंद्र सरकारच्या निधीची प्रतीक्षा आहे.
प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना स्वत:च्या जागेवर हक्काचे घर किंवा विस्तारासाठी अडीच लाखांपर्यत अनुदान केंद्र व राज्य सरकारकडून सहा टप्यात देण्यात येते़ दरम्यान या योजनेसाठी महापालिका क्षेत्रातील ५०४ घरकुल लाभार्थ्यांनी २०१९-२०२० मध्ये प्रस्ताव सादर केले होते़ त्यापैकी १५४ लाभार्थी पात्र लाभार्थ्यांचे घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे़ मंजूर मिळालेल्या लाभार्थ्यांना केंद्राचा ६० हजार तर राज्याचा ४० असा एक लाखांचे अनुदान पहिल्या टप्यात कामांच्या स्वरूपानुसार देण्यात आले़ त्यासाठी प्रत्येक घरकूल बांधकामांची पाहणी करून शासनाकडे कामाचा अहवाल पाठविण्यात येतो़
लाभार्थ्यांकडून माहिती सादर
शहरातील घरकूल लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या जुन्या इमारतील नाव नोंदणीची व्यवस्था केली आहे़घरकूल प्रकरणे मंजूर झाल्यांनतर लाभार्थ्यांंकडून आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली जात आहे़ लाभार्थ्यांनी बांधकाम आराखडे सादर केल्यानंतर कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ आतापर्यत शहरात १५४ घरकुलांची कामे सुरू आहेत़ चार ते पाच महिन्यात कामे पुर्णत्वास येतील असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे़
लाभार्थ्यांना हप्याची प्रतीक्षा
पंतप्रधान घरकूल योजनेसाठी शहरातील ८५० लाभार्थ्यांनी सुरूवातीला प्रस्ताव सादर केले आहे़ त्यापैकी ५०४ लाभार्थ्यांचे शासनाकडे डीपीआर सादर झाला होता़ त्यापैकी प्रत्यक्षा १५४ घरकुलांचे कामे सुरू आहे़ घरकुलाच्या बांधकामानुसार आतापर्यत तिसºया टप्यातील निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे़
जागेचा प्रश्न सुटणार
स्वमालकीची जागा नसल्याने शहरातील बहूसंख्य कुटुंबांना घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही. यातील बहुतांशी कुटुंबे वर्षानुवर्षे सरकारी जागेवर राहत आहेत. परंतु, या कुटुंबांकडे जागेचा मालकी हक्क नसल्याने हक्काचे घर मिळण्यास मोठी अडचण दूर होणार आहे. आता गोरगरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचा निवारा उपलब्ध होणारआहे. त्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
माहिती संकलन सुरू
अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी ग्रामपंचायत व महापालिका हद्दितील अतिक्रमण धारकांची माहिती जमा करण्यासाठी खाजगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे़ सध्या शहरात ३९ शासकीय जागेवर (घोषित झोपड्या) आहेत़ तर १९ अघोषित झोपड्या, ७ फुटपाथवरील झोपडपट्या, ६० कॉलनी, नगर व विविध भागातील झोपडपट्या आदी माहिती संकलित केली जात आहे.
शासकीय जागेचे सर्वेक्षण पुर्ण
शहरातील जुनी भिलाटी, विष्णू नगर,जमणागिरी भिलाटी, मोगलाई मशिद, भीम नगर, यशवंत नगर, शनि नगर, साईबाबा नगर, फाशीपुल, पिराची टेकडी मोहाडी, नगावबारी, चक्करबर्डी, कदमबांडे नगर देवपूर, शाळा कं्र. २ जुने धुळे, गायकवाड चौक, गांधी पुतळा जवळ पाटासमोर, संगम हॉटेलजवळ पाटावर अशा सुमारे १३५ झोपड्यापैकी ६ हजार लाभार्थ्याचे सर्वेक्षण केले आहे़
त्या जागेला विरोध
शहरातील मिल परिसरात खाजगी मालकाच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून नागरिक राहत आहे़ त्या जागा रहिवाशांच्या नावे करण्यासाठी महासभेत ठराव झाला आहे़
मात्र सदरील जागेचा वाद सुरू असल्याने सर्वेक्षण करण्यासाठी ठेकेदारास विरोध होत असल्याने काही दिवसापासून त्या ठेकेदाराने सर्वेक्षणाचे काम थांबविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.