शिरपूर तालुक्यात अमरिशभाई पटेल यांचे वर्चस्व कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:35 IST2021-01-20T04:35:14+5:302021-01-20T04:35:14+5:30
शिरपूर तालुक्यात झालेल्या ३४ ग्रामपंचायतींच्या निकालात अमरिशभाई पटेल यांचा करिष्मा यंदाही कायम चालला़ आमदार अमरिशभाई पटेल हे तब्बल ३५ ...

शिरपूर तालुक्यात अमरिशभाई पटेल यांचे वर्चस्व कायम
शिरपूर तालुक्यात झालेल्या ३४ ग्रामपंचायतींच्या निकालात अमरिशभाई पटेल यांचा करिष्मा यंदाही कायम चालला़ आमदार अमरिशभाई पटेल हे तब्बल ३५ वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते होते़ तालुकासह त्यांचे जिल्ह्यावर वर्चस्व होते़ जे राज्यात नाही ते-ते या तालुक्यात आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो़ त्यामुळेच देशासह अन्य राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधींनीही त्यांच्या विकास कामांना भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे़ तसाच प्रयोग अन्य काही लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार संघात करण्याचा प्रयत्न केला आहे़ जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न असो की, भुयारी गटारी, घर तेथे काँक्रीट रस्ता-वीज-पाणी, २४ तास निर्जंतूक पिण्याचा प्र्रकल्प असो की एज्युकेशन हब असो त्यात पटेल बंधूंनी कर्मभूमीकरिता तन-मन-धनाने अत्याधुनिक अशी कामे केली आहेत़
नवनवीन कल्पना साकारण्याचे व शहराला देशात अग्रस्थान मिळवून देण्याच्या कामी जाणीवपूर्वक प्रयत्न पटेल बंधू करीत असल्याने त्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे शिरपूर खूपच बदलले आहे. बदल हा चालूच आहे. विकासाचे कार्य त्यांचे अव्याहत सुरू आहे़ त्यामुळे धुळे जिल्ह्यातच नव्हे तर खानदेशात इतक्या झपाट्याने बदललेले शिरपूर हे एकमेव शहर असावे.
आजपर्यंत शिरपूर हे ‘एज्युकेशन हब’ होते ते आता ‘मेडिकल हब’ म्हणूनही ओळखले जाईल अशी समाधानाची चर्चा जनतेत आहे़ पुणे-मुंबई येथे ज्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळते तीच आता शिरपुरात लवकरच मिळणार आहे़ अपूर्ण सोयीसुविधांमुळे परिसरातील रुग्णांना नाशिक-पुणे-मुंबई जावे लागत होते़ यात बहुमूल्य वेळ व पैसा खर्च होत होता़ पण आता या हॉस्पिटलमुळे परिसरातील रुग्णांचे प्राण व अतिरिक्त पैसा वाचणार आहे़ पटेल बंधू नेहमीच सार्वजनिक हिताचा विचार करतात, हेच त्यातून दिसून येते़ यापुढील काळात स्मार्ट सिटी योजनेचा पुढील टप्पा म्हणून स्मार्ट आरोग्य ही संकल्पना शिरपूर जगाला देणार आहे़
गतवर्षी आमदार अमरिशभाई पटेल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत पूर्वाश्रमीच्या भाजपात दाखल झाले़ तालुक्यातील ग्रामस्थांनी देखील अमरिशभाई ज्या पक्षात जातील त्या पक्षात असतील असे समीकरण असल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा सफाया झालेला दिसतो, त्याऐवजी आता भाजपाचा झेंडा रोवलेला दिसत आहे़ त्यामुळे आज तालुक्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कुठेच दिसत नाही़ अमरिशभाईमुळे भाजपाला एक प्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे़ यापूर्वी भाजपाला बोटावर मोजण्याएवढ्याच ग्रामपंचायतींवर सत्ता मिळत होती़ भाईंमुळेच भाजपाला अधिक शक्ती मिळाली आहे़
तसेच काँग्रेस पक्षापेक्षा या तालुक्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व दिसते़ या निवडणुकीत बोटावर मोजण्या एवढ्या का असेना त्यांना संधी मिळाली आहे़ राष्ट्रवादीचे प्रमुख डॉ़. जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने देखील पाय रोवलेला दिसत आहे़