धुळे तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:38 AM2021-05-11T04:38:15+5:302021-05-11T04:38:15+5:30
धुळे- भविष्यात पाणीटंचाई उद्भवणाऱ्या धुळे तालुक्यातील गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. ज्या गावांना नवीन पाण्याची टाकी, ...
धुळे- भविष्यात पाणीटंचाई उद्भवणाऱ्या धुळे तालुक्यातील गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. ज्या गावांना नवीन पाण्याची टाकी, पाइपलाइन किंवा पाण्याचा स्रोतासाठी नवीन विहीर आवश्यक आहे. अशा कामांना तातडीने मंजुरी द्यावी. दरम्यान, आ. कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने ८३ गावांचा जल जीवन मिशन योजनेत समावेश करण्यात आल्याने पाणीपुरवठा योजनेशी संलग्नित विविध कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
मे आणि जून महिन्यात उन्हाळ्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे पूर्व नियोजनासाठी आमदार कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील प्रत्येक गावाच्या पाणीपुरवठ्याबाबत जिल्हा परिषदेच्या
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी घेतली. यावेळी आ. कुणाल पाटील यांनी गावनिहाय पाणीपुरवठ्याची स्थिती जाणून घेतली. त्यानुसार ज्या गावांमध्ये सद्य:स्थितीत किंवा मे महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाई जाणवू शकते अशा संभाव्य गावांकरिता आतापासूनच विहिरींचे अधिग्रहण करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत जि.प. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पड्यार यांनी माहिती देताना सांगितले की, मे महिन्याच्या अखेरीस धुळे तालुक्यातील संभाव्य १२ गावांमध्ये पाणीटंचाई भासू शकते. त्यात आर्णी, चिंचवार, नवलाणे, जुनवणे, अंचाळे तांडा, कुंडाणे (वेल्हाणे), बाबरे, तांडा कुंडाणे, जुन्नर, नावरी, नावरा, रामनगर (नगाव) या गावांचा समावेश आहे. त्यामुळे विहीर अधिग्रहणासह आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आ. पाटील यांनी बैठकीत दिल्या. दरम्यान, पांझरा नदी काठावर २९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे स्रोत आहेत. त्या गावांत पाणीटंचाई भासू नये म्हणून अक्कलपाडा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार त्यांनी पांझरेत पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे २९ गावांचा पाणीटंचाईचा प्रश्नही मार्गी लागणार आहे, तर मांडळ, दोंदवाड, विंचूर, बोरकुंड, रतनपुरा या गावांमध्येही मे अखेरीस पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यामुळे मांडळ लघु प्रकल्पातून पाणी आवश्यकतेनुसार सोडण्याच्याही सूचना दिल्या. दरम्यान, रामनगर (नगाव) या आदिवासी वस्तीसाठी सातपायरी धरण क्षेत्रात विहीर खोदून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याकरिता नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली असल्याची माहिती दिली. पाणीटंचाई आढावा बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे सहायक अभियंता जयदीप पाटील, शाखा अभियंता विजय गावित, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, कृउबाचे मुख्य प्रशासक रितेश पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, माजी जि.प. सदस्य साहेबराव खैरनार, पं.स. गटनेते पंढरीनाथ पाटील, अशोक सुडके, चिंचवारचे माजी सरपंच सोमनाथ पाटील, बाबरेचे सरपंच संतोष राजपूत, सुरेश पाटील, गरताडचे ग्रा.पं. सदस्य राजीव पाटील, कृष्णा पाटील, बापू खैरनार, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.