अनधिकृत वीज वापरल्यास गणेश मंडळांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:43 IST2021-09-09T04:43:32+5:302021-09-09T04:43:32+5:30
महावितरणचा इशारा : अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन धुळे : यंदा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ज्या ठिकाणी सार्वजनिक ...

अनधिकृत वीज वापरल्यास गणेश मंडळांवर होणार कारवाई
महावितरणचा इशारा : अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन
धुळे : यंदा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे, त्या मंडळांच्या मागणीनुसार महावितरणकडून तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत आहे. तसेच या तात्पुरत्या जोडणीच्या वीज वापरासाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सव मंडपातील वीज यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तूंमध्ये विद्युतप्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्विचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.
गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीज वाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते. संततधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मंडपातील वीजयंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाइटिंगच्या वायर्स खाली झुकलेल्या नाहीत ना किंवा विस्कळीत झालेल्या नाहीत ना, याची दैनंदिन तपासणी करावी.
धोका टाळण्यासाठी मंडळांनी ही घ्यावी काळजी...
गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्किट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेल्या १९१२ किंवा १८००१०२३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.