धुळे विभागाला सुमारे ३५ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST2021-03-17T04:36:45+5:302021-03-17T04:36:45+5:30

जनता कर्फ्यूच्या कालावधीत बससेवा सुरू आहे. मात्र रविवार सायंकाळपासून संचारबंदी असल्याने, अनेकांनी प्रवास करणे टाळले होते. त्यामुळे १४ रोजी ...

About 35 lakhs hit Dhule division | धुळे विभागाला सुमारे ३५ लाखांचा फटका

धुळे विभागाला सुमारे ३५ लाखांचा फटका

जनता कर्फ्यूच्या कालावधीत बससेवा सुरू आहे. मात्र रविवार सायंकाळपासून संचारबंदी असल्याने, अनेकांनी प्रवास करणे टाळले होते. त्यामुळे १४ रोजी सायंकाळी ६ वाजता जनता कर्फ्यूची अंमलबजावणी झाल्यानंतर बसस्थानकावर बऱ्यापैकी वर्दळ हेाती. मात्र रात्री सर्वत्र शुकशुकाट होता.

धुळे विभागाच्या दररोज अडीच ते तीन हजार फेऱ्या ग्रामीणसह विविध शहरांत होत असतात. मात्र सोमवारी तब्बल ११५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एका दिवसात विभागाला ३० ते ३५ लाखांचा फटका बसल्याचे सांगण्यात आले.

शहरासह जिल्ह्यातही बाजारपेठेसह सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येण्यासही काहीच अर्थ नसल्याने प्रवाशांनीही प्रवास करणे टाळले आहे. या जनता कर्फ्यूच्या कालावधीत ग्रामीण भागातील सर्वात जास्त फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सुरत या मार्गावर प्रवाशांच्या उपलब्धतेनुसारच गाड्या सोडण्यात येत आहेत. मात्र या गाड्यांची संख्याही कमी झालेली आहे. मंगळवारीही दुपारी २ वाजेपर्यंत १ हजार २० फेऱ्या कमी झालेल्या होत्या अशी माहिती देण्यात आली.

केवळ धुळे जिल्ह्यातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, तेथील जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू, अंशत: लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. याचाही परिणाम बसेसच्या प्रवासी संख्येवर झालेला आहे.

बुधवारपासून नियमित फेऱ्या सुरू होण्याची शक्यता कमीच

बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच जनता कर्फ्यू असला तरी त्यानंतर विभागातील बसफेऱ्या पूर्वीप्रमाणेच सुरू होतील की नाही हे प्रवासी संख्येवरच अवलंबून आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून दोन-तीन दिवस लागू शकतात, अशी शक्यता अधिकारी व्यक्त करीत आहेत.

खासगी प्रवासी वाहतूक जोरात

प्रवासी नसल्याने महामंडळाने अनेक मार्गांवरील बसफेऱ्या रद्द केल्याचा फायदा मात्र खासगी प्रवासी वाहतूक करणारे घेत आहेत. काही भागात टॅक्सीसेवा सुरू असून, त्यांच्याकडून दुप्पट भाडे आकारणी केली जात आहे. मात्र गरज असल्याने प्रवासीही जादा पैसे देत आहेत.

आर्थिक संकटातून सावरत नाही तोच पुन्हा धक्का

गेल्या वर्षी २३ मार्चला लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर संपूर्ण बससेवा बंद होती. यात महामंडळाचे कोट्यवधीचे नुकसान झाले. २५ मेपासून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली. मात्र त्याला प्रतिसादच मिळाला नाही. तर १९ ऑगस्टपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्यानंतर थोडाफार प्रतिसाद मिळाला. मात्र दिवाळीपासून बसला प्रचंड गर्दी होऊ लागली होती. यातून महामंडळाला उत्पन्नही चांगले मिळाले होते. या संकटातून बाहेर येत नाही तोच पुन्हा जनता कर्फ्यू लागू लागल्याने महामंडळाच्या नुकसानीत भरच पडत आहे.

Web Title: About 35 lakhs hit Dhule division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.