जिल्ह्यात ८५ ग्रामपंचायतींमध्ये राेहयोचे एकही काम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST2021-06-10T04:24:36+5:302021-06-10T04:24:36+5:30
धुळे : कोरोना, लाॅकडाऊन आणि ‘ब्रेक द चेन’च्या कठोर निर्बंधांमुळे बेरोजगारांची संख्या वाढली असताना जिल्ह्यातील ५५८ ग्रामपंचायतींपैकी ८५ ...

जिल्ह्यात ८५ ग्रामपंचायतींमध्ये राेहयोचे एकही काम नाही
धुळे : कोरोना, लाॅकडाऊन आणि ‘ब्रेक द चेन’च्या कठोर निर्बंधांमुळे बेरोजगारांची संख्या वाढली असताना जिल्ह्यातील ५५८ ग्रामपंचायतींपैकी ८५ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेचे एकही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील मजुरांना रोजगार उपलब्ध झालेला नाही.
कठोर निर्बंधांमुळे रोजगार गेल्याने महानगरातील अनेक कुटुंबे आपापल्या गावाला परतली होती. उन्हाळ्यात शेतांमध्येही कामे नसल्याने या मजुरांना कामांची प्रतीक्षा होती. परंतु काम मिळाले नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.
जिल्ह्यात सध्या राेजगार हमी योजनेची ९९५ कामे सुरू असून, या कामांवर तीन हजार ९८६ मजुरांची उपस्थिती आहे. या कामांमध्ये घरकुल योजनेच्या कामांची संख्या सर्वाधिक आहे. जलसंधारणाची कामेदेखील हाती घेण्यात आली होती.
दरम्यान, आता शेतशिवारांमध्ये कामे उपलब्ध होणार असल्याने रोहयोच्या कामांची संख्या कमी होणार आहे.
हाताला काम नाही,
अन् ‘राेहयो’ही नाही !
कोरोनाकाळात हाताला काम नाही. काम शोधण्यासाठी बाहेरही पडता येत नव्हते. रोहयोची कामे सुरू झाली असती तर रोजगार मिळाला असता. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- विद्याबाई साळवे, मालपूर
काेरोनामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राेहयो विभागाने गावात कामे सुरू केली नसल्याने हाताला काम मिळाले नाही. उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. कामे सुरू करण्याची गरज आहे.
- भरत देवरे, म्हसदी
सरपंच काय म्हणतात..?
कोरोनाकाळात रोहयोची कामे सुरू करण्याची घोषणा शासनाने केली होती. तशी मागणी आम्हीदेखील केली होती. मात्र काम सुरू झाले नाही. त्यामुळे बेरोजगार झालेल्या मजुरांच्या हाताला काम मिळाले नाही. मजूर कामाच्या शोधात आहेत. त्यांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे. मजुरांना कामाची गरज आहे.
- मच्छिंद्र शिंदे, सरपंच, मालपूर
ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्याकरिता ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक विकास होणे गरजेचे आहे. यासाठी रोजगार असायला हवा. महाराष्ट्र रोजगार हमी योजनांची कामे करण्यावर भर देण्यात यावा. सिंचन विहीर, फळबाग लागवड योजना स्थानिक स्तरावर लवकरात लवकर सुरू करावी.
- शैलेजा देवरे, सरपंच, म्हसदी
कामे सुरू करणार
मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामे सुरू करण्याच्या सूचना सर्व विभागांना केल्या आहेत. मजुरांनी मागणी नोंदवावी. तशा सूचना विविध विभागांना दिल्या जातील.
- गाेविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी, रोहयो