जिल्ह्यातील ७७ गावे, ३३ वाड्यांवर एप्रिलनंतर पाणी टंचाईची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:07 IST2021-03-04T05:07:56+5:302021-03-04T05:07:56+5:30

धुळे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५६६.३० मि.मी. आहे. मात्र २०१९ मध्ये ८४४.३८ व २०२० मध्ये ७३०.१५ मि.मी. पावसाची नोंद झाली. ...

77 villages, 33 wadis in the district likely to face water shortage after April | जिल्ह्यातील ७७ गावे, ३३ वाड्यांवर एप्रिलनंतर पाणी टंचाईची शक्यता

जिल्ह्यातील ७७ गावे, ३३ वाड्यांवर एप्रिलनंतर पाणी टंचाईची शक्यता

धुळे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५६६.३० मि.मी. आहे. मात्र २०१९ मध्ये ८४४.३८ व २०२० मध्ये ७३०.१५ मि.मी. पावसाची नोंद झाली. म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याला दुष्काळाची झळ सहन करावी लागत होती. मात्र दोन वर्षांपासून होत असलेल्या मुबलक पावसामुळे पाणी टंचाईची समस्या नसल्यासारखीच आहे.

दरवर्षी साधारणत: ११० ते १३० गावांना व ८० पेक्षा अधिक पाड्यांना पाणी टंचाईची झळ बसत असते. या पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनाला ॲाक्टोबर महिन्यापासूनच पाणी टंचाईचा कृती आराखडा तयार करावा लागतो. विशेष म्हणजे जिल्ह्यातील धुळे व शिंदखेडा तालुक्यातील काही गावांना बाराही महिने पाणी टंचाई भासत असते. तेथे वर्षातील नऊ-दहा महिने टँकरनेच पाणी पुरवठा करावा लागतो, अशी स्थिती असते. मात्र दोन वर्षांपासून येथील परिस्थिती पूर्णत: बदललेली आहे. मुबलक पावसामुळे सर्वच ठिकाणी पाण्याची मुबलकता असल्याने, परिणामी पाणी टंचाई नाही. गेल्यावर्षी जिल्ह्यात २-३ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे.

यावर्षी ७७ गावांना टंचाईची शक्यता

गेल्यावर्षही मुबलक प्रमाणात पाऊस असल्याने, जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत पाणी टंचाई जाणवणार नाही अशी शक्यता आहे. मात्र पुढील दीड महिन्यात टंचाईची शक्यता गृहीत धरून आराखडा तयार करण्यात आलेला आहे. धुळे तालुक्यातील १२ गावे, साक्री तालुक्यातील २५ गावे व २६ पाडे, शिरपूर तालुक्यातील १८ गावे व ६ पाडे, तसेच शिंदखेडा तालुक्यातील २२ गावे व १ पाड्यावर टंचाईची शक्यता आहे. या टंचाई निवारणार्थ काही ठिकाणी टँकरने तर काही ठिकाणी खासगी विहीर अधिग्रहित करून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. यासाठी तब्बल ११० उपाययोजना आहेत.

यावर्षी भर उन्हाळ्यात महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. असे असले तरी पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे.

पाणी टंचाईसाठी आराखडा तयार

दरवर्षी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व भूजल सर्वेक्षण विभाग हे दोघे संयुक्तरित्या पाणी टंचाईचा आराखडा तयार करीत असतात. यात कोणत्या महिन्यात किती गावांना पाणी टंचाई जाणवू शकते याचे नियोजन करून त्यावर उपाययोजना केलेल्या असतात. त्यामुळे टंचाईवर मात करणे शक्य होते.

यावर्षी मिळाला दिलासा

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे पाणी टंचाईपासून जिल्हावासीयांना मुक्तता मिळालेली आहे. दोन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टँकरची मागणी केली जायाची. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकही टँकर सुरू नाही.

एकाही गावाला अद्याप टँकर सुरू झालेला नाही

धुळे तालुका व शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांना दरवर्षी पाणी टंचाईची झळ बसत असते. काही गावे तर टँकरवरच अवलंबून असतात अशी स्थिती आहे. मात्र दोन वर्षांपासून अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस होत असल्याने, अजून एकाही गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू झालेला नाही.

संभाव्य टंचाईसाठी विहीर अधिग्रहण प्रस्तावित

जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी टंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे. त्यानंतर काही गावांना पाणी टंचाईची झळ बसू शकते. यावर पर्याय म्हणून पाणी पुरवठा विभागाने ९९ विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव तयार करून ठेवलेला आहे. यात धुळे तालुक्यातील १२ वाडे, साक्री तालुक्यातील २१ गावे ४५ वाडे, शिरपूर तालुक्यातील ६ गावे २४ वाडे, व शिंदखेडा तालुक्यातील १ गाव व १८ वाड्यांचा समावेश आहे.

Web Title: 77 villages, 33 wadis in the district likely to face water shortage after April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.