सीबीएसईचे ५०० विद्यार्थी परीक्षा न देता होणार पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST2021-04-18T04:36:09+5:302021-04-18T04:36:09+5:30

धुळे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द केली आहे तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ...

500 CBSE students will pass without taking the exam | सीबीएसईचे ५०० विद्यार्थी परीक्षा न देता होणार पास

सीबीएसईचे ५०० विद्यार्थी परीक्षा न देता होणार पास

धुळे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने दहावीची परीक्षा रद्द केली आहे तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात सीबीएसईचे दहावीचे ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण होणार आहेत.

याबाबत पालकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही पालक म्हणतात परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे तर काहींच्या मते जीवापेक्षा परीक्षा महत्वाची नाही. काही पालकांनी मात्र परीक्षा रद्दच्या निर्णयाला विरोध केला आहे. ऑनलाईन का असेना पण आळस येऊ नये यासाठी परीक्षा घ्यायला हव्या होत्या.

शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी दुहेरी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिक्षणापेक्षा आरोग्याला प्राधान्य देणे उचित आहे. कोरोना रुग्णांची आणि मृत्यूची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे बोर्डाने कठोर निर्णय घेतला आहे. परंतु ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या विद्यार्थी परीक्षा देऊ शकले असते असे मतही त्यांनी नोंदविले आहे.

परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना निकालाची चिंता सतावत आहे. निकालासाठी मंडळाने वस्तुनिष्ठ निकष ठरवला आहे. निकालाबद्दल विद्यार्थ्याना हरकत घेता येणार आहे.

सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी

मुले २८९

मुली २११

११ वी, आयटीआय प्रवेश कसे होणार

दहावीची गुणपत्रिका, टक्केवारी पाहून ११ वी आणि आयटीआयला प्रवेश दिला जातो. परंतु दहावीच्या विद्यार्थ्याना परीक्षा न घेता सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने ११ वी आणि आयटीआयला प्रवेश कसा द्यावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कला शाखेला जाणाऱ्यांच्या बाबतीत फारशी अडचण येणार नाही. पण विज्ञान आणि वाणिज्यला प्रवेश घेताना घोळ होऊ शकतो.

गुणदान सम पाळीवर कसे आणणार

यंदा परीक्षाच रद्द करुन सरसकट सर्व विद्यार्थ्याना उत्तीर्ण केल्याने गुण कसे दिले जातील. मागील वर्षांची प्रगती पाहून गुण देण्याचा विचार असला तरी काही विद्यार्थ्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर सर्वच विद्यार्थ्याना गुण न देता केवळ उत्तीर्ण केले तर पेच निर्माण होईल. गुणदान सम पातळीवर आणण्यासाठी सीबीएसई बोर्डाला मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहे.

बोर्ड परीक्षा ही झालीच पाहिजे ऑफलाईन होण्यासाठी अडचणी येत असतील तर टप्प्याटप्याने ऑनलाईन घेऊन विद्यार्थ्याना पुढील प्रवेशासाठी मोकळे करावे. परीक्षेचे महत्व विद्यार्थ्याना असलेच पाहिजे काही अंशी तरी त्याचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे.

- अनिल जैन, पिंपळनेर

आयुष्यात अनेक परीक्षांना सामोरे जावे लागत असते. कोणतीच परीक्षा आपल्या जीवापेक्षा महत्वाची नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हावे. शासनाने घेतलेला निर्णय विद्यार्थी हिताच आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.

- रमेश साळुंके, शिरपूर

कोरोनाचा संसर्ग बघता परीक्षा रद्द होणे,ठीक असले तरी परीक्षा होणे महत्त्वाचे होते.या मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आम्ही शिक्षकांनी भरपूर मेहनत घेतली आहे. एक वर्षापासून विद्यार्थी शाळेत गेले नाहीत. हे चुकीचे आहे. - संदीप पाटील, दोंडाईचा

शाळा आणि परीक्षा महत्वाची नसून शिक्षण महत्वाचे आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. शिक्षणत खंड पडू दिला नाही. महामारीच्या काळात काही कठोर निर्णय शासन घेत आहे. नियमांचे पालनही केले पाहिजे. शिवाय शाळा, शिक्षण आणि परीक्षेपेक्षाही आरोग्य महत्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग सुरु असल्याने परीक्षेसाठी विद्यार्थींच्या जीविताचा धोका पत्करणे उचित होणार नाही. परंतु ऑनलाईन परीक्षेचा पर्याय स्वीकारायला हरकत नव्हती. - प्रा. पी. आर. पवार, धुळे

Web Title: 500 CBSE students will pass without taking the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.