जिल्ह्यात ३५१ कुपोषित बालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:33 IST2019-08-06T21:33:03+5:302019-08-06T21:33:26+5:30
धुळे : ग्रामबालविकास केंद्रात दाखल केले तीव्र कुपोषित बालक, नियमित आहार दिला जातो

जिल्ह्यात ३५१ कुपोषित बालके
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील तब्बल पावणेदोन लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातून जिल्ह्यात ३५१ तीव्र तर १ हजार ३२३ बालके मध्यमस्वरूपाचे कुपोषित बालके आढळून आले आहेत. तीव्र कुपोषित असलेल्या बालकांचे वजन वाढवून त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जिल्ह्यातील २२७ ग्रामबालविकास केंद्रात दाखल केले आहे. या बालकांना अतिरिक्त आहार देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील एकात्मिक बालविकास विभागातून देण्यात आली.
धुळे जिल्ह्यात असलेल्या महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयांतर्गत २१०४ अंगणवाड्या आहेत. जिल्ह्यातील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील १ लाख ७३ हजार ८०६ बालकांची सुरुवातीला अंगणवाड्यांमधील पर्यवेक्षिकांमार्फत वजन तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर या बालकांची पुन्हा आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. त्यात ३५१ बालके तीव्र कुपोषित आढळले. ते वजन, वय व उंचीच्या प्रमाणात कमी आढळले.
*तीन महिने ठेवणार*
कमी वजन असलेल्या बालकांचे वजन वाढवून त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जिल्ह्यात ग्रामबालविकास केंद्र सुरू करण्यात आलेली आहे. ग्रामबालविकास केंद्रात शुन्य ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना दाखल करण्यात येते. पूर्वी एकच महिना तीव्र कुपोषित बालक बालविकास केंद्रात असायचा.
आता मात्र या बालकांना तीन महिने या केंद्रात ठेवण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०१९ या कालावधीसाठी दहा प्रकल्पांतर्गत २२७ ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यात धुळे भाग-१ मध्ये १४, धुळे भाग-२मध्ये ३४, धुळे भाग ३ मध्ये ११, शिंदखेडा भाग-१मध्ये २२, शिंदखेडा भाग २ मध्ये ३५, शिरपूर भाग-१ मध्ये ३०, शिरपूर भाग २ मध्ये ३१, साक्री-१४, पिंपळनेर १३ व दहिवेल येथे २३ अशीएकूण २२७ ग्राम बालविकास केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. कुपोषित बालकांची सख्या घटली : यापूर्वी जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत जिल्ह्यात बालविकास केंद्र सुरू करण्यात आली होती. त्यात ३४३१ तीव्र कुपोषित बालके दाखल करण्यात आली होती. या बालकांना नियमित आहार देण्यात आला. यातून तब्बल ३४१० बालकांचे वजन वाढून ते कुपोषणमुक्त झाले. तर केवळ १२ मुले कुपोषित राहिल्याची माहिती देण्यात आली आहे.