रोजी गेली, तरी २ लाख ९३ हजार कुटुंबांना मिळणार रोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST2021-04-16T04:36:25+5:302021-04-16T04:36:25+5:30
धुळे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या १५ दिवसांच्या कठोर लाॅकडाऊनमुळे रोजी बंद झाली असली तरी जिल्ह्यातील ...

रोजी गेली, तरी २ लाख ९३ हजार कुटुंबांना मिळणार रोटी!
धुळे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या १५ दिवसांच्या कठोर लाॅकडाऊनमुळे रोजी बंद झाली असली तरी जिल्ह्यातील सुमारे २ लाख ९३ हजार ३१४ कुटुंबांच्या रोटीची मात्र शासनाने व्यवस्था केली आहे.
गेल्यावर्षाप्रमाणेच यावेळी देखील अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांतील लाभार्थींना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
परंतु लाॅकडाऊन सुरू होऊन दोन दिवस झाले तरी अजूनपर्यंत प्रशासनाला कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. अन्नधान्याच्या वितरणासाठी मोठ्या प्रमाणावर पुरवठा साखळीचे नियोजन करावे लागते. धान्याची मागणी नोंदवल्यावर धान्याचा कोटा प्राप्त झाल्यास तो गोदामातून प्रत्येक रेशन दुकानापर्यंत पोहोचवावा लागतो. त्यानंतर धान्याचे वितरण सुरू होते. या संपूर्ण प्रक्रियेला काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. लाॅकडाऊन १५ दिवसांचा असल्याने लाॅकडाऊन संपल्यावर धान्य मिळणार का, असा प्रश्न रेशनकार्डधारकांना पडला आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मोफत धान्याची घोषणा शासनाने केली असली तरी याचा लाभ केवळ दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना मिळणार आहे की अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना याबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही. शिवाय शेकडो गरिबांचा प्राधान्य यादीत समावेश नाही. त्यामुळे त्यांना मोफत धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. गेल्यावर्षी शासनाने टप्प्याटप्प्याने सर्वांनाच मोफत आणि स्वस्त धान्याचा लाभ दिला होता. त्याप्रमाणे यावेळी देखील द्यावा. गहू, तांदूळसह डाळ, साखर, तेल यांचेही वितरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुकानांमध्ये गर्दी झाली तर...
गेल्यावर्षी नियमित धान्य आणि मोफत धान्य घेण्यासाठी रेशन दुकानांवर गर्दी उसळली होती. लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या. तशीच गर्दी यावेळी देखील उसळणार आहे. दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करतात. पुरवठा विभागाकडून देखील वेळोवेळी तशा सूचना दिल्या जातात; परंतु कोरोनापेक्षा पोटाचा प्रश्न महत्त्वाचा असलेल्या गरिबांना कोरोना नियमांचा विसर पडतो; परंतु जीवदेखील महत्त्वाचा आहे हे त्यांनी आता ओळखले पाहिजे.
गहू, तांदूळ मोफत
अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. नियमित धान्याच्या व्यतिरिक्त मिळणार याचे स्पष्टीकरण नाही.
लाॅकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून मोफत धान्य मिळणार असले तरी स्वयंपाकासाठी लागणारे इतर साहित्य तर खरेदीच करावे लागणार.
- संजय गवळी
शासनाने लाॅकडाऊनमध्ये मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला असला तरी केवळ धान्यावर घर चालत नाही याचाही विचार करायला हवा होता. हातावर पोट असणाऱ्यांना लाॅकडाऊन कोरोनासारखेच आहे.
- सुनील मोरे
लाॅकडाऊन जाहीर होऊन दोन दिवस झाले. शासनाने मोफत धान्याची केवळ घोषणा केली आहे. रेशन दुकानावर तपास केला असता, अजून आदेश आले नसल्याचे सांगण्यात आले. मग लाॅकडाऊन संपल्यावर धान्य मिळणार असेल तर त्याचा काय उपयोग. शिवाय १५ दिवसांनंतर लाॅकडाऊनची मुदत पुन्हा वाढवली तर सर्वसामान्य गरिबांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ शकते. वर्षभरापासून गरीब भरडला जात आहे. - योगेश तांबे.