आवाड शिरपुरा बंधाऱ्यात पाणी साेडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST2021-05-07T04:34:19+5:302021-05-07T04:34:19+5:30
कळंब : तालुक्यातील आवाड शिरपुरा येथील बंधाऱ्यात पाणी साेडण्यास मांजरा प्रकल्प टाळाटाळ करीत हाेता. हा प्रकार समाेर आल्यानंतर खासदार ...

आवाड शिरपुरा बंधाऱ्यात पाणी साेडले
कळंब : तालुक्यातील आवाड शिरपुरा येथील बंधाऱ्यात पाणी साेडण्यास मांजरा प्रकल्प टाळाटाळ करीत हाेता. हा प्रकार समाेर आल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बैठक घेत तंबी दिली. यानंतर मांजरा प्रकल्प विभागाकडून बंधाऱ्यात पाणी साेडले. याचा चार गावातील शेतीला फायदा होणार आहे.
मांजरा प्रकल्पाचा लातूर, उस्मानाबाद व बीड या तीनही जिल्ह्याला फायदा होतो. मांजरा नदी चांगली प्रवाही होत प्रकल्प भरला की लातूर, अंबाजोगाई, कळंब, केज आदी शहरे व गावांची तहान तर भागवली जातेच, शिवाय बॅकवॉटर व लाभक्षेत्रातील गावातील बागायती बहरते.
एकूणच प्रकल्पात पुरेशा पाणीसाठा असला की प्रकल्पाच्या ९० किमी डाव्या व ७८ किमी लांबीच्या उजव्या कालव्यातून पाण्याचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात येते. याबरोबरच या कालव्यातून आवाड शिरपुरा शिवारातील दोन को.प. बंधाऱ्यांतही पाणी सोडण्यात येत असते. प्रकल्पाची ओंजळ भरलेली असल्यावर आजवर हा शिरस्ता पाळण्यात आलेला आहे.
असे असताना यंदा मात्र प्रकल्प फक्त लातूरकरांसाठीच आहे असा समज करून बसलेल्या प्रकल्प विभागाने मागणी होऊनही शिरपुऱ्याच्या बंधाऱ्यात पाणी सोडण्यास टाळाटाळ केल्याने यावर निर्भर शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अखेर या विषयावर आयोजित बैठकीत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यामुळे बुधवारी तत्काळ बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे.
चौकट...
एकमेव ‘अॅक्टिव्ह’ पाणी वापर संस्था तरी...
तालुक्यातील आवाड शिरपुरा, सौंदना अंबा, दाभा व केज तालुक्यातील सौंदना भिसे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत श्री विठ्ठल कालवा पाणी वाटप सहकारी संस्था उभी केली आहे. या संस्थेचे उमेश कुलकर्णी अध्यक्ष, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रामलिंग आवाड उपाध्यक्ष असून, ही एकमेव ‘अॅक्टिव्ह’ असलेली पाणी वापर संस्था आहे. प्रकल्प विभागाचा एक रुपयाही देणं ठेवत नाही. अगदी अगाऊ रक्कम जमा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. असे असतानाही प्रकल्प विभाग या संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बंधाऱ्यात पाणी सोडण्यास टाळाटाळ करत होता.
शेकडो हेक्टरला फायदा; पण....
विठ्ठल पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आवाड शिरपुरा हद्दीमधील नदीपात्रात दोन काेल्हापुरी बंधारे आहेत. यातील एकात उजव्या तर दुसऱ्यात डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येते. यापैकी एकाचा टेलएन्ड प्रकल्पालगत तर दुसऱ्याचा शिरपुऱ्यालगत आहे. एकूणच चारेक किमी अंतरावर कोट्यावधी लीटर पाण्याचा साठा होत शेकडो एकर शेतीला याचा फायदा होत असतो. परंतु, यात पाणी सोडण्यास टाळाटाळ करत तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो.
खासदारांनी घेतली आक्रमक भूमिका...
शेतकऱ्यांना मांजरा प्रकल्प विभाग जुमानत नसल्याच्या तक्रारी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी लाभक्षेत्र विभागाचे लातूरचे अधीक्षक अभियंता श्री म्हेत्रे व प्रभारी कार्यकारी अभियंता यांची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीस शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रामलिंग आवाड व काही शेतकरी उपस्थित होते. यावेळी पाणी सोडण्यास का टाळाटाळ केली जाते, याचा जाब खासदारांनी उभय अधिकाऱ्यांना विचारत धारेवर धरले. उद्यापर्यंत पाणी नाही सोडले तर मी स्वतः तेथे पोहोचून पुढील पावले उचलेल, असा सज्जड इशारा दिला. यानंतर गुरुवारी तातडीने पाणी सोडले.