अंत्यसंस्कारासाठी जागाही पडतेय अपुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:29 IST2021-04-26T04:29:18+5:302021-04-26T04:29:18+5:30
उमरगा : शहर व तालुक्यात कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाही अपुरी पडत असल्याचे ...

अंत्यसंस्कारासाठी जागाही पडतेय अपुरी
उमरगा
: शहर व तालुक्यात कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाही अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. अनेक वेळा जागा नसल्याने शवदाहिनी सोडून स्मशानभूमीतील मोकळ्या जागेत सरण रचून अंत्यविधी करण्याची वेळ पालिका कर्मचाऱ्यांवर येत आहे. गेल्या पंधरा दिवसात उमरगा शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६८ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
उमरगा शहरात कोरोना अक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे. शिवाय, मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. दिवसाला किमान सात ते आठ जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडत आहेत. शहरातील सरकारी कोविड रुग्णालयाबरोबरच पाच खासगी कोविड रुग्णालयातही कोरोना रुग्ण भरती केले जात आहेत. सध्या ४३५ कोरोना रुग्णावर उपचार चालू असून, याचबरोबर मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रात्रंदिवस अंत्यसंस्काराचे काम पालिका कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. गेल्या महिनाभरात कोरोनामुळे ८० जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी ६८ जणांचा मृत्यू गेल्या पंधरा दिवसात झालेला आहे. दिवसाला किमान सात ते आठ जणांवर येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. यासाठी पालिकेची पाच जणांचे पथक कार्यरत आहे.
विद्युत शवदाहिनीची गरज
एक अंत्यसंस्कार पार पाडण्यासाठी किमान ५०० किलो लाकूड लागते. दिवसभरात सरासरी सात ते आठ मृतांवर येथे अंत्यसंस्कार केले जातात. पालिका प्रशासन यासाठी शहरातील लाकडी अड्ड्यातून लाकडाची व्यवस्था करीत आहे. परंतु, कोरोनाचे हे संकट पाहता पालिका प्रशासनाने स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनी बसविण्याची गरज व्यक्त कली जात आहे.