शिबिरे घेऊन पारधी समाजाला अत्यावश्यक कागदपत्रे पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST2021-08-20T04:37:05+5:302021-08-20T04:37:05+5:30

उस्मानाबाद : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जिल्ह्यातील अनेक पारधी कुटुंबांकडे नागरिक म्हणून आवश्यक असलेली कागदपत्रे ...

Take camps and provide essential documents to the Pardhi community | शिबिरे घेऊन पारधी समाजाला अत्यावश्यक कागदपत्रे पुरवा

शिबिरे घेऊन पारधी समाजाला अत्यावश्यक कागदपत्रे पुरवा

उस्मानाबाद : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जिल्ह्यातील अनेक पारधी कुटुंबांकडे नागरिक म्हणून आवश्यक असलेली कागदपत्रे अद्याप उपलब्ध नाहीत. ती येत्या तीन महिन्यात शिबिरे घेऊन देण्यात यावीत, असे निर्देश राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी येथे दिले.

येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नेवाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सोलापूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी शुभांगी कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात अडीच हजार पारधी कुटुंबे आहेत. त्यापैकी काही कुटुंबांकडे अद्याप आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळख पत्र, जातीचा दाखला ही अत्यावश्यक कागदपत्रे नाहीत. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी येत्या तीन महिन्यात शिबिराद्वारे ही कागदपत्रे देण्यात येतील, असे सांगितले आहे. याबाबत सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांनीही सकारत्मक प्रतिसाद दिला असल्याचे पंडित म्हणाले.

आदिवासी पाड्यावर राहात असलेल्या नागरिकांना अद्याप मूलभूत सुविधा मिळण्यासह आणखी बऱ्याच गोष्टींची सुरुवात झालेली नाही. त्या सुविधा त्यांना मिळाव्यात, यासाठी आपण उस्मानाबाद आणि सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांना भेटून काही सुविधा आदिवासींना मिळाव्यात, अशी सूचना केली आहे. यानुसार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम कार्यक्रम हाती घेतला असून, यामध्ये २ हजार ५०० पारधी कुटुंबांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रत्यक्ष भेटीत सांगितल्याचेही पंडित म्हणाले.

नेमक्या वस्त्या किती ?

अंगणवाडीच्या आकडेवारीवरून जिल्ह्यात पारधी समाजाच्या ६० वस्त्या असून, आदिवासी प्रकल्प विभागाकडे ८० वस्त्यांची नोंद आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जिल्ह्यात पारधी समाजाच्या १४० वस्त्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नेमक्या किती वस्त्या आणि किती पारधी कुटुंबं आहेत, याची नेमकी माहिती नोंदविण्याचे आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे मिशन आरंभअंतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

पारधी समाजाला टार्गेट करू नका

स्वातंत्र्यापूर्वी पारधी बांधवांवर गुन्हेगारीचा शिक्का मारला गेला आहे. त्यामुळे कोठेही आणि कोणीही चोरी केल्याबरोबर सर्वप्रथम पोलीस संशयित चोर म्हणून पारधी बांधवांना सरसकट उचलतात. यापुढे पोलिसांनी चौकशी करून चोरी करणाऱ्यास अटक करावी. पण, गुन्हेगारी समाज म्हणून प्रत्येक वेळी पारधी समाजातील नागरिकांनाच टार्गेट करू नये, अशा सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Take camps and provide essential documents to the Pardhi community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.