उपविभागीय अधिकाऱ्यांची माेह्याला अचानक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:31 IST2021-05-01T04:31:31+5:302021-05-01T04:31:31+5:30
मोहा - कोरोनाच्या 'अॅक्टिव्ह' रुग्णांची जास्त संख्या असलेल्या माेह्याचा ‘टाॅप फाइव्ह’ गावांच्या यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे येथील उपाययाेजनांवर ...

उपविभागीय अधिकाऱ्यांची माेह्याला अचानक भेट
मोहा - कोरोनाच्या 'अॅक्टिव्ह' रुग्णांची जास्त संख्या असलेल्या माेह्याचा ‘टाॅप फाइव्ह’ गावांच्या यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे येथील उपाययाेजनांवर प्रशासनाची बारीक नजर आहे. शुक्रवारी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी अचानक गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी पर्यवेक्षक ते ग्रामपालक अधिकारी यांच्या कामाची तर तलाठी ते ग्रामसेवक यांच्या उपस्थितीची खातरजमा केली. यानंतर संबंधिताना उपाययाेजनांची काटेकाेर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले.
कळंब तालुक्यातील मोहा येथे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मागील दहा दिवसात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. सद्यस्थितीत अॅक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या पन्नासावर पोहोचली आहे. यामुळेच उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी गावात 'जनता कर्फ्यु' लागू केला आहे.
गावातील साखळी तुटावी, यासाठी सर्व यंत्रणेला सतर्क व कार्यशील रहावे, असे सुचित केले आहे. याच पार्श्वभूमीवर गावात नेमकं काय चाललं आहे? कर्मचारी काम करीत आहेत का? याची खातरजमा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी मोहा गावाला शुक्रवारी अचानक भेट दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार रोहण शिंदे, गट विकास अधिकारी एन. पी. राजगुरू उपस्थित होते. यावेळी त्यांनी ग्रापं. कार्यालय गाठून पाहणी केली असता, सरपंच राजू झोरी, ग्रामसेवक लोकरे, तलाठी प्रवीण भातलवंडे, पोलीस पाटील प्रकाश गोरे, माजी सरपंच बाबासाहेब मडके, सलीम मोमीन यांची उपस्थिती होती.
यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी गावातील सध्याची रुग्णसंख्या, माझे गाव, कोरोनामुक्त गाव अभियानाची अंमलबजावणी याविषयी माहिती जाणून घेतली, तसेच गावात फिरुन उपाययाेजनांची पाहणी केली. यावेळी दोन दुकाने उघडी असल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी आशा, अंगणवाडी ताई यांच्याशी संवाद साधला.
चौकट...
दररोज मुख्यालयी थांबा...
तलाठी, ग्रामसेवक यांना गावातील परिस्थितीबाबत माहिती विचारली असता, त्यांना ‘अपडेट’ माहिती देता येत नाही. या दरम्यान ग्रामस्थांनी तलाठी गावात थांबत नाहीत अशा तक्रारीचा सूर आवळला. यावर उपविभागीय अधिकारी गाठाळ यांनी तलाठी यांना गावात दररोज थांबावे, अशी सूचना केल्या. तर तहसीलदार रोहन शिंदे यांनी याविषयी कानउघाडणी केली. आस्थापना बंद ठेवाव्यात, अशा सूचना असताना, चालू कशा राहतात, अशा शब्दात जाबही विचारला.
त्यांच्या रिपोर्टवर तुम्ही कार्यवाही करा...
यावेळी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी अंगणवाडी ताई, आशा, मदतनीस अशा सर्व पर्यवेक्षकांच्या कामाची माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केले. पर्यवेक्षकांनी ऑक्सिजन पातळी कमी असलेल्या व तापमान जास्त असलेल्या लोकांचा रिपोर्ट केल्यावर तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच यांनी त्या लोकांची तपासणी करून घेण्याच्या यावेळी सूचना देण्यात आल्या.