९५४ शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा ससेमिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST2020-12-30T04:41:57+5:302020-12-30T04:41:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : शेतकर्‍यांना निश्चित मदत करणार्‍या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्या तालुक्यातील ...

Sasemira of recovery behind 954 farmers | ९५४ शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा ससेमिरा

९५४ शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा ससेमिरा

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब : शेतकर्‍यांना निश्चित मदत करणार्‍या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्या तालुक्यातील ९५४ लाभार्थ्यांना आता उचललेली रक्कम परत करण्यासाठी प्रशासनाने नोटीस बजावल्या असून, जवळपास पाऊण कोटींपैकी पाच लाखांची वसुली करण्यात आली आहे.

लहरी निसर्गावर शेती निर्भर असलेले असंख्य शेतकरी अल्प उत्पन्न गटात मोडतात. यामुळे बेभरवशाची बनलेली शेती कसणार्‍या शेतकर्‍यांना निश्चित आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. यानुसार केंद्र शासनाच्या निकष व अटींमध्ये पात्र असलेल्या शेतकर्‍यांना गतवर्षीपासून प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये मदत देण्यात येते. प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम शेतकर्‍यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येते. मागच्या वर्षापासून करण्यात येत असलेल्या या मदतीचे आजवर सहापेक्षा जास्त हप्ते जमा करण्यात आले आहेत.

दरम्यान, निकषात बसत नसतानाही ‘चाललं तर चाललं’ म्हणून योजनेसाठी अपात्र असलेल्या काही व्यक्तिंनी मदत उचलल्याचे समोर आल्यानंतर तालुक्यातील अशा ९५४ लाभार्थ्यांच्या पाठीमागे आता उचललेली रक्कम भरण्यासाठी ससेमिरा लागला आहे. यानुसार तहसील कार्यालयाने अशा व्यक्तिंना नोटीस बजावत रक्कम तहसीलदार यांच्या खात्यावर जमा करण्याची तंबी दिली आहे.

चौकट....

तालुक्यात ३८ हजार लाभार्थी...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत प्रथमतः अल्प भूधारक शेतकर्‍यांना मदतीचे कवच मिळत होते. यानंतर याची व्याप्ती वाढवण्यात आली. यामुळे तालुक्यात या योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढली. तालुक्यात जवळपास ६९ हजार शेतकरी खातेदार आहेत. यापैकी ३८ हजार ६११ शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सध्या लाभ मिळत आहे.

७८९ आयकर दाते रडारवर

शेती नावावर असली तरी प्राप्ती कर भरणा करणार्‍या सधन व्यक्तिंना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले होते. असे असतानाही तालुक्यातील ७८९ आयकर दात्यांनी पीएम किसान योजेनाचा लाभ घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तालुक्यातील या करदात्यांना पीएम किसान योजनेतून उचललेली रक्कम भरणा करावी, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

पाऊण कोटीच्या वसुलीसाठी नोटीसा

कुटुंबातील एक सदस्य पात्र असेल तर सामाईक खात्यावरील दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय नाही. यासह विविध संविधानिक पदे, पेन्शनर आदींना पीएम किसानचा लाभ देय नाही. यापैकी १६५ अपात्र व्यक्तिंनी अनुदान उचलले आहे. यामुळे प्राप्ती कर भरणा करणारे व इतर कारणांमुळे अपात्र असलेल्या एकूण ९५४ व्यक्तिंना पाऊण कोटी रुपये तहसीलदार यांच्या खात्यावर भरणा करा म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रतिक्रिया

प्राप्ती कर भरणा करणार्‍या तसेच इतर अपात्र असलेल्या व्यक्तिंनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत उचललेली अनुदान रक्कम परत भरणा करावी, यासाठी नोटीस बजावली आहे. संबंधित व्यक्तिंनी नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत रक्कम जमा करावी, असे कळवले आहे.

- मंजुषा लटपटे, तहसीलदार कळंब

Web Title: Sasemira of recovery behind 954 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.