शेतात राहून सैनिकमाता लढली, गंभीर स्थितीतही कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST2021-05-25T04:36:32+5:302021-05-25T04:36:32+5:30
कळंब तालुक्यातील हासेगाव (केज) येथील बालिका ज्ञानेश्वर यादव यांना ताप, अंगदुखी, सर्दी व दम लागणे असा त्रास ...

शेतात राहून सैनिकमाता लढली, गंभीर स्थितीतही कोरोनावर मात
कळंब तालुक्यातील हासेगाव (केज) येथील बालिका ज्ञानेश्वर यादव यांना ताप, अंगदुखी, सर्दी व दम लागणे असा त्रास सुरु झाला. भारतीय सैन्यदलात कर्तव्यावर असलेले त्यांचे पुत्र रामहरी यादव हे सुट्टीवर असल्याने गावीच होते. त्यांनी ही कोरोनाची लक्षणे आहेत हे लक्षात येताच शासकीय रुग्णालयात कोरोना चाचणी केली. त्यामध्ये पॉझिटीव्ह रिपोर्ट आला. त्यामुळे उस्मानाबाद येथे जाऊन एचआरसीटी तपासणी केली. त्यात ४० पैकी २१ स्कोर आला. दम लागत असल्याने दवाखान्यात बेडसाठी धावपळ सुरु झाली. मात्र, कोठेही बेड मिळाला नाही. शेवटी त्यांनी कळंब येथील डॉ. शाम चौधरी यांची भेट घेतली. त्यांच्या हॉस्पिटलमध्येही बेड शिल्लक नव्हता, परंतु त्यांनी औषधे दिली. परिस्थिती लक्षात घेऊन रामहरी यादव यांनी आईला आधार देताना हा आजार छोटा आहे, डॉक्टरांनी औषधे दिली आहेत व शेतात रहायला सांगितले आहे. यातून लवकर नीट होशील, अशा शब्दांनी बळ भरले. बालिका यादव यांनीही सकारात्मक विचार केला व या आजाराला शेतात राहूनच पळवून लाऊ, असा शब्द दिला व तो खरा ठरवून दाखविला.
तब्येत उत्तम, ऑक्सिजनही चांगले...
सध्या आईची तब्येत चांगली आहे. ऑक्सिजन पातळीही ९६ पर्यंत आली आहे. आजारपणाच्या काळात आम्ही शेतात राहून उपचार केले. त्याचाही चांगला फायदा झाला. सर्वसाधारण आजारासारखाच कोरोना आहे हे समजून त्याला सामोरे आई सामोरे गेली. मनात भिती नाही बाळगली, सकारात्मक विचार ठेवले व योग्य औषधोपचार घेतला तर नक्कीच कोरोनावर घरी किंवा शेतात राहूनही बरे होऊ शकतो, हे आईने दाखवून दिल्याचे रामहरी यादव यांनी सांगितले.
कोट...
दररोज सकाळी योगासन, अनुलोम विलोम, कपालभाती, कोमट पाणी पिणे, योग्य आहार आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेच्या वेळेवर घेणे असा दिनक्रम ठेवला. याबरोबरच दररोज सकारात्मक विचार, मन आनंदी ठेवणे व दररोज लिंबाच्या झाडाखाली विश्रांती घेतल्याने चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळाली, असेही त्यांनी सांगितले. यामुळे दहा दिवसातच तब्येत पूर्वपदावर आली. मुलाने दिलेला मानसिक आधार कोरोनाविषयी असलेली मोठी भिती मनात न ठेवल्याने तसेच निसर्गाच्या सानिध्यात उपचार घेतल्याने कोरोनावर मात करू शकले.
-बालिका यादव